Wednesday, 28 September 2011

स्वगत संवाद - १२

आज अगदी अनपेक्षितपणे एक अनोखा अनुभव घेतला.  अनोखा हा शब्दप्रयोग मी माझ्या मर्यादित भावविश्वापुरत्या संदर्भात वापरतो आहे.  एरवी जी घटना सांगतो आहे ती काही फार जगावेगळी मुळीच नाही. घडलं एवढच की आज प्रथमच  एका चित्रकारासमोर पोर्ट्रेटसाठी सिटींग दिलं.  मलाही प्रत्यक्ष त्यासाठी बसण्यापूर्वी फार काही थरारक वाटलं नव्हतं. किंबहुना आत्ताही तसं काही वाटत नाही आहे.  पण तरीही प्रत्यक्ष ते चालू असताना ते मी खूप एंजॉय केलं .. अर्थात  ह्यामागेही एक छोटीशी पार्श्वभूमी (नेहमीप्रमाणे) आहेच.

बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.  मित्र विजय कुवळेकर तेव्हां कोल्हापूर सकाळचा संपादक होता. आणि म्हणून कोल्हापूरला रहायचा.  शिवाय तिथं एक जिगरी  दोस्त होताच. डॉ. अविनाश जोशी .. अविनाशची माझी ओळख मी पुण्यात आलो त्याच वर्षी मनोहर साप्ताहिकातर्फे  झालेल्या एका शिबिरात झाली होती.  त्या ओळखीचं रूपांतर पुढे घट्ट मैत्रीत झालं.. त्याच्यामुळेच माझा कोल्हापूरशी आजतागायत सुरू असलेला खोल ऋणानुबंध सुरू झाला.  त्याचा नागाळा पार्कमधला देखणा बंगला हा  तेव्हाचा माझा कायम विसावा होता. अविनाश व्यवसायानं डॉक्टर पण आंतून विलक्षण कलासक्त... साहित्य-नाटक-चित्रपट-संगीत ह्याबरोबरच चित्र आणि शिल्प ही त्याची वेडं होती.  गंमत म्हणजे त्यांत स्वत:ला काही गती असण्या अथवा नसण्याचा मुद्दाच त्याच्या संदर्भात संभवत नव्हता.  त्यातील कलाकारांवर तो जिवापाड प्रेम करायचा. त्यांत उगवत्या कलाकारापासून अगदी ज्येष्ठ नामवंतापर्यंत सर्वांकडे त्याचा अखंड राबता असायचा. आणि त्याही लहान थोर कलाकारानां ह्या उमद्या व्यक्तित्वाची ओढ असायची. नाटक, चित्रपट आणि त्यामुळे संगीत हे सगळे त्याची जिव्हाळ्याचे विषय होतेच.  पण मला उगीचच आश्चर्य वाटायचं ते, त्याला असलेल्या चित्रकला आणि शिल्पकला ह्या दोन्हीच्या वेडाच ..त्याच्या रोजच्या  दिनक्रमात  क्लिनिकमध्ये जाता येतां रवींद्र मेस्त्रीच्या स्टुडियोत जाउन त्यांचं त्या त्या वेळी सुरू असलेलं चित्र किंवा शिल्प घडताना पहात बसणं हे जणू त्याचं व्रत असावं इतक्या इमानाने तो ते पाळायचा. रवींद्रजीनाही त्याचं खूप अगत्य होतं.   पन्हाळ्यावर त्यांनी बनवलेला बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा पूर्णाकृती पुतळा नजरबंदी करणारा आहे.  पण त्याचं मूळ प्लास्टर ऑफ पेरिस मधलं मस्तक अविनाशच्या दिवाणखान्यात त्यानं दिमाखात  मांडून ठेवलं होतं. तर अशा ह्या कलासक्त अविनाशच्या घरी मी विख्यात चित्र-ऋषी श्री. कें. बी  कुलकर्णीनां प्रथम भेटलो. 

बेळगाव-धारवाडकडचे कें.बी.कुलकर्णी ह्या नांवाचा दबदबा मी खूप दिवस ऐकून होतो. चित्रकार रवि परांजपे आणि जॉन फर्नाडीस ह्यांचे ते गुरू.  मुंबईला नाट्य संपदाच्या कार्यालयात एक सुंदर पोर्ट्रेट लावलेलं होतं.  एक खूप वेधक, मोहक स्त्री सौंदर्य त्या चित्रात रेखीत केलेलं होतं.  मी न राहवून प्रभाकर पणशीकरांना हे चित्र कुणी केलंय म्हणून विचारलं आणि त्यांनी अपूर्वाईनं मला सांगितलं,  बेळगावचे कें. बी. कुलकर्णी . माझ्या आयुष्यातला तो कें.बी.चा पहिला प्रवेश..  विजय कुवळेकरही त्यांच्याबद्दल नेहमी भरभरून बोलायचा.  अशा हया पार्श्वभूमीवर कें.बी. मला अविनाशकडे दोस्तांच्या कोंडाळ्यात प्रथम भेटले.   माझ्या डोळ्यासमोर त्याचं कसलंही कल्पनाचित्र तोवर उभं राहिलं नव्हतं.  पण ते मला दिसण्या-वागण्यासह खूप आवडले.  त्यांची चित्र  आणि ते स्वत: ह्यामध्ये एक संगती होती.  साधेपणाची, सहजतेची, स्वाभाविकतेची..  मला कां कुणास ठाउक त्यांना पहातांना तेव्हां नुकत्याच काळाच्या पडद्याआड गेलेल्या आमच्या पी. आर. शिंदेसरकारांची आठवण झाली.  त्यामुळं मी काही न बोलता त्यांना केवळ न्यहाळत होतो.  विजय कुवळेकर, चंद्रकांत जोशी, अविनाश सगळेच त्याच्या खूप जवळचे, त्यामुळं थट्टा मस्करीत मैफिल रंगत होती.  विजय मधेच मिस्कीलपणे म्हणाला.  आमच्यासारखे देखणे चेहरे समोर आहेत पण कें.बी काही आमचं पोर्ट्रेट करीत नाहीत.  कें.बी.ही गंमतीने आणि तरीही मन:पूर्वक म्हणाले..  काय आहे, नुसता देखणा चेहरा असून होत नाही ..त्या चेह-यात काहीतरी आणखी असावं लागतं.. हा चेहरा बघा..  आणि अगदी अनपेक्षितपणे त्यांचं बोट  त्यांनी माझ्याकडे वळवलं .. ..स्वत:च्या रूपांविषयी कसलेही गोंडस गैरसमज माझे तेव्हाही नव्हते आणि आजही नाहीत.. पण तरीही आरपार मोहरलो होतो. एका चित्रकारानं आपली निवड केली हाच अपूर्व आनंद होता.  प्रत्यक्षात तो योग आला नाही, पण तरीही त्या क्षणाचा  तो आनंद इतक्या वर्षात कणभरही ओसरलेला नाही. 

त्यानंतर बरेच वर्षांनी अगदी अलीकडे, एका चित्र-प्रदर्शनात भेटलेल्या एका तेव्हां अनोळखी असलेल्या चित्रकार कलावतीनं ह्याच उद्गाराची पुनरुक्ती केली होती.  सर, मला तुमचं पोर्ट्रेट करायला आवडेल. मी ते हसून सोडून दिलं होतं.  अगदी अलीकडे चित्रकार बुवा शेटेशी ओळख झाली.. त्या पहिल्या काही भेटीतच ते मला म्हणाले होते, मला तुमचं पोर्ट्रेट करायला आवडेल.. अर्थात माझ्या पद्धतीनं हं .. आता तर ते माझे सख्खे शेजारी आहेत.. पण तो योग प्रत्यक्षात येण्याचा  सुयोग अजून जुळलेला नाही.  कारण ह्या गोष्टी मुद्दाम ठरवून होत नाहीत, त्या आपसूक घडाव्या लागतात.. तसं अगदी अलीकडे उल्हास जोशीनं माझं अप्रतीम पोर्ट्रेट केलं..मात्र ते कुमार गोखलेंनी काढलेल्या एका चायाचित्रावरून . दुसरं रघुवीर कुलनी समोर काही न ठेवता माझं एक शंभर टक्के इम्प्रेशनिसट असं चित्र केलं आहे. दोन्ही  मुक्तछंदमधील माझ्या मेकशिफ्ट स्टुडियोत ही लटकली आहेत.. सुंदर कलाकृती म्हणून,  माझी छबी म्हणून नक्कीच नव्हे..  अगदी ह्या सर्व पार्श्वभूमीवर नुकतीच ही घटना घडली.  .  . 

परवाच्या शनिवारी बालगंधर्व कला दालनात एका गुरुकुल पद्धतीच्या विद्यार्थी आणि गुरूच्या सहयोगातून एक प्रदर्शन भरलं होतं..  मी प्रमुख पाहुणा होतो.  नवीन चित्र पहायला मिळतात, जुने-नवे चित्रकार एकत्र भेटतात आणि मुख्य म्हणजे तो माहौल मनापासून आवडतो, म्हणूनचं केवळ प्रमुख पाहुणेपदाची अवजड झूल मी अंगावर घातली होती. सुदैवानं प्रदर्शनाचे उद्-घातक होते अहमदनगरचे विख्यात शिल्पकार, श्री. कांबळे.  पहिला औपचारिक समारंभ संपला.  त्यानंतर कांबळे ह्याचं प्रात्यक्षिक व्हायचं होतं.  पूर्व नियोजित कार्यक्रमामुळं मला निघणं भाग होतं आणि एक छान अनुभव हुकणार म्हणून हुरहूरही वाटत होती.  पण इलाज नव्हता.  मी ती पहिली सभा संपताच निघायच्या बेतात होतो.  तेव्हढ्यात कांबळेजी अनपेक्षितपणे म्हणाले.  मी सुधीर मोघेसाहेबांनाच माझ्या ह्या प्रात्यक्षीकासाठी निवडू इच्छितो.  मला तर निघण्याची घाई ..काय करावे कळेना. त्यावर स्वत: कलाकाराचे आर्जवी शब्द ...मी आत्ता शिल्प करत नाहीये.  आधी मी फक्त तुमचं एक स्केचमधील पोर्ट्रेट करणार आहे  ..केवळ पंधरा-वीस मिनिटं लागतील.. नकार देणं शक्यच नव्हतं.. आणि बरेच वर्षे हुकत असलेला एक योग अचानक पुढे ठाकलेला तो नाकारून जाणं हे करंटेपण ठरलं असतं.  अखेर थांबलो.   

सिनेमा नाटकात काही काळ वावरल्यामुळे पोझ देणे ह्या गोष्टीची नवलाई किंवा धास्ती नव्हती.  पण फोटोच्या एका स्नेपपुरतं वेगवेगळ्या पोझेस देणे आणि एकाचं पोझमध्ये सलग १५=२० मिनिटं अविचल बसणं हे अंमळ दिव्य वाटत होतं.  पण आता कुठे जाशील टोळम्-भट्ट ..म्हणत खुर्चीवर त्यांच्या आदेशानुसार बसलो.. आणि शरीर-मनाची एक मजेदार जोड प्रक्रिया सुरू झाली.   

मी माझ्याकडून खूप मन:पूर्वक ह्या अनुभवाला सामोरं जायचं असं क्षणात जणू कसलाही मुद्दाम विचार न करता ठरवलं.  आरंभी मन आणि शरीर ही दोन स्वतंत्र अस्तित्व एकमेकांशी नाठाळ वागतात की काय असं वाटत होतं.  बहुधा तसा त्यांचा बेत होताही.  पण कशी कोण जाणे ती हळूहळू हातात हात घालून चालू लागली ..खुर्चीवर बसताना थोडी अवघडलेली वाटणारी अवस्था विरघळून एक अपरिहार्य सहजता अंगोपांगी खेळू लागली.  मनातून एक प्रसन्नता उमलून एक मंद हास्य मुद्दाम न आणता जणू आंतूनच फुलून मुद्रेवर पसरू लागलं ..ते खूप स्पष्ट किंवा प्रकट नव्हतं...पण ते माझं मलाच आंतून जाणवत होतं, म्हणजे ते तिथं असणार असा एक दिलासा वाटत होता.  आता हे असंच टिकवायचं म्हणजे तद्दन नाटकीपणा, तो नको असं एकीकडे वाटत असताना तो ताण हलकेच ओसरला.. कारण एका अनामिक आनंदाच्या सूक्ष्म लहरी आंतून येउन ओठांवर   विरत होत्या.  आणि एक विरते तोवर दुसरी तिथे पोचत होती.  मी आंतल्या डोळ्यांनी जणू स्वत:लाच न्याहाळू लागलो होतो.  

हे घडत असतांना एकीकडे एक दुसरं सघन अस्तित्व डोळ्यासमोर आपला नियोजित प्रवास करीत होतं.  इतका वेळ माझ्या जवळ खुर्चीवर बसलेली व्यक्तीच प्रथम त्या ईझेलआडून माझ्याकडे  ओझरते कटाक्ष टाकीत पुन्हा इझिलकडे वळत होती. पण काही क्षणातच ती व्यक्तीही वेगळी होऊ लागली. विशेषत: ती नजर ..खूप त्रयस्थ पण तरीही माझ्यावर खिळलेली.. माझ्यात गुंतलेली... त्या नजरेतले भाव तसे तटस्थ होते पण तरीही क्षणाक्षणाला ते पालटत होते... पहाता पहाता ते माझ्यात आणि समोरच्या ईझेलमध्ये बुडत चालले होते.  म्हणजे एकीकडे मी माझ्यात आणि दुसरीकडे ते त्यांच्यात आणि तरीही काहीतरी संवाद घडत होता.. किंबहुना त्या संवादाच्या आधीन आम्ही दोघेही झालो आहोत की काय असं वाटत होतं.
                पुगीत गारुडी
                पेरित जाई प्राण
                डोलतो त्यावरी
                नाग भान हरपून
                जणू इंद्रजाल वीणतात स्वरांचे धागे
                विळख्यात गुंतले
                            नाग-गारुडी, दोघे ..
असं काहीतरी.. असा नक्की किती काळ गेला कुणास ठाउक ..एका क्षणी एक शेवटचा टच देउन ते इझेलपासून दूर झाले आणि पहाता पहाता स्वत:मध्ये सुखरूप परतले.  त्यापाठोपाठ काही क्षणांत मीही माझ्यामध्ये, पहिला होतो तसा, स्थापित झालेला मी स्वत: चाचपून तपासून पाहिला ..इतका वेळ चिडीचूप झालेला भोवताल पुन्हा सांवरून गजबजू लागला होता.. 
               काहीतरी पूर्ण झालं होतं.. काहीतरी हरवलंही होतं. 

२८ सप्टेंबर २०११, घटस्थापना.. वाई.            

No comments:

Post a Comment