प्रिय,
आज हे लिहायला निमित्त आहे, ते एका केवळ चार ओळीच्या कवितेचं. ही कविता स्फुरली सुमारे दीड वर्षांपूर्वी .. अगदी अलीकडे म्हणजे अगदी परवा परवा ती अचानक आठवली .तुला ती नक्की आवडेल ह्याची खात्री होती.. आणि तसंच झालं. तेव्हाच म्हणालो होतो की ह्या कवितेची जन्मकथाही एकदा सांगेन म्हणून.. मग वाटलं की ह्या स्वगत संवाद माध्यमातून ह्या निमित्ताने ती सर्वांनाच सांगावी.. तर आज तो मूड लागला आहे. ..आमच्या लहानपणी अनावृत्त पत्र म्हणून एक प्रकार होता, तसं काहीतरी हे लिहिणं होतं आहे असं जाणवतंय. असो. तर आजचा विषय आहे, त्या चार ओळीच्या कवितेची जन्मकथा...
तसं पाहिलं तर आपणहून ही कविता मी लिहिली असती असं वाटत नाही. आकाशवाणी पुणे केंद्राची मागणी म्हणून मुळात ती लिहिली गेली. पुणे आकाशवाणी आणि मी ह्यांचं हे नातं तसं खूप जुनं आहे. अगदी, सखी, मंद झाल्या तारकापासूनचं... तेव्हापासून खूप गीतं मी पुणे आकाशवाणीसाठी लिहिली. पण गेल्या काही वर्षात हा चार ओळीच्या मुक्तकाचा नवाच सिलसिला सुरू झाला आहे. त्याचा आरंभ झाला तो पुणे आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापासून..... तेव्हाच्या केंद्राधिकारी उषा पागेनां त्याचं श्रेय द्यायला हवं. उषा साधी अनाउन्सर होती तेव्हांपासूनची आमची ओळख.. मी तेव्हां पुणे रेडियोवर केज्युअल आर्टिस्ट म्हणून यथेच्छ बागडत होतो. खूप मनमौजी मस्त दिवस होते ते..(तसे ते नव्हते कुठले म्हणा..) तर त्या मैत्रीच्या अधिकाराने मला उषाने आकाशवाणी पुणे केद्राचा सुवर्णमहोत्सव म्हणून चार ओळी लिहून दे असा आग्रहाचा आदेश दिला. मी हो म्हणालो आणि जॉ गायब झालो तो आता ध्वनिमुद्रणाची तारीख अगदी गळ्याशी आली तेव्हां उगवलो. उषाचे सगळे सहकारी अधिकारी हवालदिल झाले होते..पण उषाचा माझ्यावर विश्वास होता आणि तो विश्वास खाली पडू देणे हे मलाही पटणार नव्हतं.. पर्यायानं त्या एका दिवसात मी त्या चार ओळी फर्मास लिहिल्या.. सुवर्ण महोत्सवासाठी म्हणून सुवर्णमुद्रा ही संज्ञा होती. तिचाच उपयोग करून मी त्या ओळी लिहिल्या .. इतकच नाही तर तिच्याच आग्रहावरून संगीतकार म्हणून स्वरबद्ध करून त्या ओळी रेकॉर्डही करून दिल्या.. अविनाश चंद्रचूडनं म्युझिक अरेंजमेंट केली आणि ते गाण्यासाठी सलील कुलकर्णी, अंजली, जितेंद्र अभ्यंकर ही खाशी मंडळी होती. ते सम्पूर्ण सुवर्ण महोत्सवी वर्षं त्यानं गाजवलंचं. पण . आजही ते छोटूकलं गीत वारंवार प्रसाररित होत असतं. खूप साधी पण प्रवाही अशी ती चाल माझी मलाही आवडते. गंमत म्हणजे अगदी रेकॉर्डिंगच्या वेळी त्या गीताच्या आरंभी ला ला ला ला ..अशा अक्षरातून एक आलापी मला सहज सुचली. नंतर स्मरणकोषाचा शोध घेतल्यावर ध्यानांत आलं की दिनकरराव अमेम्बलांनी वाद्यवृंदातून ज्या सुंदर सुंदर धून बांधल्या होत्या, त्यातील नायकी कानडा रागामध्ये जी नितांत सुंदर धून आहे, त्यातून ते स्वर मी नकळत वेचले होते. रेडियो हे मुळातच माझं फार लाडकं माध्यम आहे. शिवाय एक श्रोता आणि कलावंत ह्या दोन्ही नात्यानी माझी घडण रेडियोमाध्यमानं केली आहे, हे मला अभिमानान सांगावं असं वाटतं. त्याचीच परिणती म्हणजे ते छोटंसं मुक्तक ..
वारा उधळी सुगंध जगती अनंत हातांनी
त्या लहरीना जणू लाभली अमृतमय वाणी
शब्द-स्वरांची अखंड वाहे संजीवक धारा
लक्ष मनांवर..
नभोवाणीची सुवर्णमुद्रा.
हया गीतानंतर तशी एक मालिकाच सृरू झाली. त्यातील अगदी अलीकडची रचना म्हणजे तुला पाठवलेली ती चार ओळीची कविता, स्वदेश.. त्याचं झालं असं की पुणे रेडियोवरच्या प्रभा जोशी ह्या अभ्यासू प्रयोगशील व्यक्तीनं मला मुळात हे काव्य लिहिण्याची विनंती केली. विषय ऐकताच आवडला आणि म्हणून मी होकार देउन मोकळा झालो.. पण पुढे काय ? आम्ही वा-यावरचे वारकरी ..ते थोडेच कुणाच्या हाती लागणार.. त्यातून प्रभा जोशी तशा सौम्य अनाग्रही .. शिवाय तशी घाईही नव्हती .त्या आपल्या अधून मधून फोन करायच्या. मी एव्हाना सर्वच विसरलेला असायचो. मग पुन्हा पहिल्यापासून सगळी उजळणी ..त्यावर आता देतोच असं माझं भरघोस आश्वासन आणि पुन्हा वां-यावरची वरात पुढे चालू.. असे दिवस नाही तर महिने गेले. दरम्यान किर्लोस्कर शतक महोत्सव फिल्मनिर्मितीत आकंठ बुडालो आणि जणू स्वत:लाही विसरलो ..तिथं बापड्या ह्या कवितेचा काय पाड ?
पुढील शूटिंगच्या आंखणीसाठी किर्लोस्करवाडीत मुक्काम ठेवून होतो. सोबत योगेश नांदूरकर त्याच्या काही कामानिमित्त आलेला होता.. कारखान्याचा सविस्तर फेरफटका, विविध अधिका-यासमवेत बैठकी अशी धामधूम चालली होती. लंचच्या आधीची शेवटची मीटिंग तर चक्क कारखान्याच्या प्रवेशद्वारापाशी चालली होती. तेव्हढ्यात फोन वाजला.. फोनवर आनंद मोडक हैराण स्वरात बोलत होता.. अहो कविराज, त्या बाई आता ऑक्सिजनवर आहेत.. उद्या सकाळी रेकोर्डीग ..परवा पासून पहिला ब्रॉडकास्ट देता नां .. दरम्यान मी त्याबाबतच्या विस्मृतीत आपदमस्तक बुडालेला ..अपराधी स्वरात मी विचारलं .. सॉरी ..आनंद .. पण विषय काय आहे ? .. त्यानं बहुधा तिकडे कपाळावर हात ठेवून पुन्हा एकदा तो विषय नव्यानं सांगितला. खरोखर तो विषय सुंदरच होता... परदेशी उच्च शिक्षण घेउन तिथेच दीर्घकाळ वास्तव्य व उज्वल भवितव्य असलेल्या पण तरीही मायदेशी परतून इकडे रुजण्याची जिद्द घेउन जगणा-या व्यक्तीच्या मुलाखती हा तो विषय होता.. आणि त्या मालिकेचं शीर्षक होतं, स्वदेश.. मला स्वत:च्याच ऐदीपणाचा जरासा रागच आला होता. मी अजीजीच्या स्वरांत आनंदला म्हणालो.. आनंद, सॉरी. पण आज रात्री गेस्ट हाउसच्या माझ्या खोलीत तंद्री लावतो आणि काहीतरी तुकडा पाडतोच. मग नेहमीप्रमाणे फोनवर डीक्टेट करीन.
हे सगळं चालू असताना योगेश बरोबर होताच. तो आपला निमूटपणे सारं ऐकत होता. व्ही. आय.पी. गेस्ट हाउसच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण चालू केलं .. फिल्मच्या पुढच्या दुपारच्या कार्यक्रमाचे किडे डोक्यात होतेच. काही क्षण गेले असतील, आणि मोबाईल वाजला. फोनवर प्रभा जोशी होत्या.. त्यांनी काही बोलायच्या आंत मीच त्यांना आनंद मोडकशी झालेला संवाद सांगून आश्वस्त केलं. हे असे संवाद ह्यापूर्वीही त्यांनी खूपदा ऐकले असल्याने त्यांच्या स्वरातली काळजी जराही ओसरलेली नाही हे मलाही जाणवत होतं. मी फोन ठेवला .. काही क्षण गेले आणि एकदम पुन्हा मोबाईल उचलून प्रभा जोशींचाच नंबर फिरवला.. आणि मी एकदम म्हणालो, प्रभाजी, काहीतरी डोक्यांत येतंय.. आनंदशी बोलून नंतर तुम्हाल फोन करावा असं वाटत होतं. पण ऐकता जरा ? माझं पुढचं बोलणं ऐकता ऐकता त्यांच्या स्वरातील आधीचे काळजीचे कभिन्न मेघ कुठल्या कुठे विरले आणि जणू काही, पाचूच्या हिरव्या माहेरी उन हळदीचे आले. त्याच टवटवीत स्वरात त्या म्हणाल्या .. मला तुम्ही म्हणाला होताच. काही क्षण लागतील, पण ते क्षण केव्हा उगवतील ते सांगता येणार नाही.. पुन्हा सांगता ओळी ? मी उतरवून घेते.. आणि मोडकांनां देते.. अर्ध्या तासांत आनंदचा उत्फुल्ल फोन.. क्या बात है कविराज, म्हणून आम्ही तुमच्याकरता थांबतो, कितीही .. तर प्रिय, तीच ही कविता बरे... स्वदेश..
जिथे जन्मतो सद्-भाग्याने .. त्याचे नांव, स्वदेश
जिथे वाढतो आणि घडतो .. त्याचे नांव, स्वदेश
पृथ्वीच्या पाठीवर नंतर जां मग कोठेही
पुन्हा पुन्हा जो तुम्हा बोलवी
त्याचे नाव स्वदेश..
इतका वेळ हे सगळं जे काही चाललं होतं त्याचा मूक पण डोळस साक्षीदार असलेला योगेश हळूच म्हणाला, हे काय आहे प्रकरण ? मग त्याला थोडक्यात कथासूत्र वन लाईन सांगावं तसा संक्षिप्त अहवाल दिला. तो पहातच राहिला.. आणि मग म्हणाला ..पण इतके दिवस न स्फुरलेल्या आणि आता काही क्षणांत थेट उद्गारासारख्या आलेल्या ह्या ओळी तुम्हाला कुठे सुचल्या ते तुमच्या कशात आलंय कां ? तुमच्या स्वदेशात ... अरे खरंच की.. मी ताडकन उडालोच. जिथे मी जन्मलो, वाढलो घडलो आणि पुढच्या आयुष्यात कलावंत म्हणून केलेल्या कमाईच्या अधिकारामुळ मोठ्या विश्वासानं ज्यानं मला पुन्हा जवळ बोलावून घेतलं आहे त्या माझ्या जन्मगावात, किर्लोस्करवाडीत ह्या ओळी मला सुचल्या. पण म्हणजे ह्या मुहूर्तावर जन्म घेण्यासाठी ही छोटीशी कविता खोळम्बून राहिली होती की काय ?
आणि मग स्वदेश ह्या शब्दाचा परीघ केवढातरी विस्तारत चालला. आपला देश, आपला गांव, आपली भूमी, आपलं अवकाश, आपली पृथ्वी, इतकच नाही तर केवळ स्वत:चाच असलेला आपल्या आंतला परिपूर्ण स्व आणि त्या स्व ने आपल्याला बहाल केलेला आपापला स्व-धर्मही.. पण म्हणजे हिंदू मुस्लीम सिख ईसाई तसला धर्म नव्हे.. तर विश्व स्वधर्म सूर्ये पाहो मधला तो स्वधर्म ...
तेव्हां, प्रत्येक व्यक्तीचं चरित्र जसं आपापल्या परीनं रसमय, तशीच प्रत्येक कवितेची जन्मकथाही स्वतंत्र, स्वयम्भू स्वयंपूर्ण.. माझ्यापुरतं बोलायचं तर माझं आणि माझ्या कवितेचं नातं पुन्हा चार ओळीतच व्यक्त करता येईल.
मी कवितेची वाट पाहतो
माझ्या नकळत
अकल्पितातुन येते कविता
तिच्याहि नकळत..
प्रिय सुधीर,
ReplyDeleteमाझ्या मनातलं कसं काय हो बोललात?! हे समजायला मला स्वत:ला २१ वर्षं लागली, कधीपासून बेचैनी जाणवत होती तरीही. आणि तुम्ही किती साध्या शब्दांत मांडून बसलात! टोपी उतरवून सलाम!
अनिल परांजपे
kharech. shabd algad kagadavar utaratat ani haluhalu tyacha pravah chalu hoto! aplyala tya xanaparyant tya oli mahitarhi nasatat!
ReplyDeleteमी शब्दात मांडूच शकत नाही. शब्दांचे जादूगार आहात आपण.
ReplyDeleteसुधीरजी, एखादी कल्पना आपण खऱ्या अर्थाने अक्षर करता...
ReplyDelete