गेले काही वर्षापासून मराठी वाद्यवृन्द नामे क्षेत्रातील निवेदक ह्या जमातीत आपल्या बोलण्यात कविता वापरण्याची एक (स्वत:च स्वत:वर लादलेली) सक्ती आढळून येते. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही.. कारण तब्बल चाळीस वर्षापूर्वी आमच्या स्वरानंद संस्थेनं आपली आवड हा पहिलावहिला मराठी वाद्यवृंद सुरू केला.. त्यामध्ये पहिला निवेदक (आजच्या भाषेत, सूत्र-संचालक) ह्या नात्याने मीच ही प्रथा सुरू करायला नकळत कारणीभूत झालो.... तो इतिहास मजेदार आहे.. निमित्ता-निमित्ताने आजवर सांगितला गेलेला आहे.. पण केवळ संदर्भ म्हणून इथे अगदी थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो...कारण मुख्य सांगायची आहे ती कविता निवेदनात समाविष्ट करण्यामागची विचार-प्रक्रिया.
साल १९७०.. नुकताच पुणेकर झालेला मी ह्या नव्या जगांत स्वत:ची एक जागा निर्माण करण्याच्या शोधात होतो... समोर दिसणारी दारं निमंत्रण देत होती. पण काही ना काही कारणांनी मी त्यांना सन्मुख होत नव्हतो.. काहीवेळा तीही मला हूल देउन मिटत होती. अशा दोलायमन मन:स्थितीत मी लक्ष्मी क्रीडा मंदिरात झालेल्या आपली आवड ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला केवळ श्रोता म्हणून उपस्थित राहिलो. ते दिवस हिंदी ऑर्केस्ट्राच्या भरभराटीचे होते.. त्या झगमगत्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा महाराष्ट्रातील पहिला मराठी वाद्यवृंद त्याच्या वेगळेपणामुळे आणि साधेपणामुळे मला खूप भावाला. आणि मलाही कळण्याआधी मी त्यांत दाखल झालो.. निवेदक म्हणून. ही भूमिका मला अगदी अनपेक्षित होती.
माझ्याआधी सुहास तांबे ते काम करीत होता. सुहास देखणा होता, बुद्धिमान होता.. बहुश्रुत होता... उमेदीचा लेखक होता. 'डियर पिनाक', 'ती येते' ह्यासारख्या त्याच्या गाजलेल्या एकांकिका अजून क्षितिजाआड होत्या. पण ती चमक त्याच्या लिहिण्या बोलण्यात नक्कीच होती. पण तरीही तो ह्या निवेदक भूमिकेत कम्फर्टेबल नाही असं दिसत होतं. त्यालाही ते जाणवत होतं. एकदा प्रयोगानंतर त्यानं मला, माझं काय गडबडतंय म्हणून विचारलंही. मला तरी काय कुठे कळत होतं ?.. मी त्याला त्याच्या रंगमंचावरील हालचालीविषयी काही सुचवून पाहिलं ..पण त्याहून अधिक महत्वाची अशी एक गोष्ट मी नकळत मांडली होती. तू प्रत्येक भावगीताआधी जे थोडं भावूक पण कृतक काव्यात्मक बोलतोस.. त्याहून काहीतरी थेट, ठोस पण तरीही ह्रदयाला भिडणार बोलायला हवं.. असं बोललो खरा, पण म्हणजे नेमकं काय हे मला तरी कुठे ठाउक होतं ? म्हणून ते आव्हान माझ्यावरच गुदरल्यावर मीही काही काळ गोंधळून गेलो. पण हळू हळू धुकं निवळलं.
तेव्हां माझी रेडियो श्रवणभक्ती ऐन जोसात होती. प्रामुख्याने रेडियो सिलोन, विविध भारती, रेडियो पाकिस्तान हे त्यांत होतेच. पण रोज दुपारी रेडियो दिल्ली केंद्रावरचा एक कार्यक्रम मी नियमित ऐकायचो. त्यांत आवडती हिंदी गाणी असायची. पण त्याहीपेक्षा माझं आकर्षण होतं ते दोन गाण्यांमधलं निवेदन.. ताजे तरूण स्त्री आणि पुरुष-स्वर चमकदार शेरोशायरीतून ती गाणी ओवीत जायचे. ते शेर पुढच्या गीतांच्या आशयाला कधी समांतर तर कधी वेगळाच अंदाज व्यक्त करणारे असायचे.. पण त्यातूनच पुढचं गीत हलकेच उमलून येतं आहे असं ऐकताना भासायचं.. मी हाच प्रकार माझ्या निवेदनात वापरायचा ठरवला. सुदैवानं विश्वानाथ ओकही ते कार्यक्रम ऐकत होता.. त्यामुळी त्यालाही माझी कल्पना पसंत पडली. पण तरीही आम्हा दोघानाही प्रत्यक्ष रंगमंचावर हा प्रयोग किती हिट ठरणार आहे, ह्यांचा अंदाज नव्हता.. १९७१ च्या नोव्हे-डिसेबरमध्ये माझ्या ताज्या टवटवीत कविता घेउन रंगमंचावर उभा राहिलो. आणि त्या क्षणार्धात एका दीर्घकालीन लोकप्रियतेच्या लाटेवर आम्ही सगळे डौलात तरंगू लागलो.. स्वरानंद संस्था, आपली आवडच आमचा कलाकार चमू आणि अर्थात कवी=निवेदक म्हणून स्वत:, सुधीर मोघेही.