तुम्ही आठवणीतले दिवस लिहा म्हणून सांगितलं आणि नाही म्हटलं तरी माझा ब-यापैकी गोंधळ उडाला.. एक कलाकार आणि माणूस म्हणून जाणीवपूर्वक जगण्याची चार दशकं पहाता पहाता उलटली म्हटल्यावर आठवणीतल्या दिवसांची मालिका ही, आजच्या भाषेत बोलायचं तर अनेक वाहिन्यांच्या अनेक एपिसोड्सचा ऐवज होण्याइतकी साठली आहे. नेमकं कुठलं चेनेल उघडावं हा संभ्रम खरं तर ह्या क्षणापर्यंतही संपलेला नाही.. शेवटी ठरवलं की डोळे झाकून नाणे-फेक करावी आणि लिहू लागावं.. पाहू कुठले दिवस वर आपसूक उसळून येतात ते.....नंतर मग त्याचंच आख्यान लावू... शेवटी कीर्तनकराचा मुलगा मूळ पदावरच जाणार की.. तर आजचा विषय आहे, माझे मुंबईतले दिवस. खरं म्हणजे तो तसा स्वतंत्र पुस्तकाचाच विषय आहे. १९७३ मध्ये माझं हे मुंबई-अफेअर सुरू झालं ते जवळ जवळ १९९७ पर्यंत म्हणजे सलग पंचवीस वर्षं चालू राहिलं.. कारण ह्या सर्व काळात मी मुंबईचा हंगामी स्वरूपाचा कां होईना पण अखंड रहिवासी होतो. मुंबईची पहाट, सकाळ, ऐन मध्यान्हीची दुपार, कलती दुपार, निवत चाललेली संध्याकाळ, समुद्रात विलीन होणारी मावळती, त्यापाठोपाठची, उतरली तारकादळे जणू नगरात अशी झगमगती रात्र- मध्यरात्र आणि थकव्याची कसलीही चिन्ह न दाखवणारी रसरसलेली उत्तररात्र हे सगळं चक्र मीही सर्वांगानं पाहिलं, अनुभवलं-भोगलं आहे. त्यातले हे काही मोजकेच अंश..
लहानपणी खरं तर मुंबई ह्या शहराची मला प्रचंड धास्तीच होती. एका छोट्याशा सुव्यवस्थित टुमदार गांवात जन्मला-वाढल्यामुळे असेल, पण कोशातील रेशमी किडा किंवा ट्यूबमध्ये उगवलेला जीव, तसा मी होतो. त्यामुळं मुंबईच्या अवाढव्य विश्वांत जाणे ही नुसती कल्पनाही दाणादाण उडवणारी वाटायची परंतू नियतीच्या योजनेचा जो प्रवाह मला बालपणापासून आवडणा-या पुण्यात घेउन आला तो प्रवाह मला पुण्यात रेंगाळू न देता थेट मुंबईत पोचवल्यावरच पुन्हा मूळ गती घेउन वाहता झाला. त्यानंतर मात्र त्या महानगरानं मला खूप मायेनं स्वत:त सामावून घेतलं. आणि दोन पायांवर ताठ उभं रहायलाही शिकवलं आज जो मी कुणी आहे, त्या माझ्या होण्या आणि असण्यामध्ये मुंबईचा वाटा फार मोठा आहे. जे काही माझी कमाई म्हणता येणार नाही असे भाग्य-योग आहेत, तीही मुंबईचीच देणगी आहे.
माझे मुंबईतले दिवस म्हटलं की किती गोष्टी मनांत जाग्या होऊ लागतात.. ह्या प्रदीर्घ काळात जिथे जिथे मी राहिलो त्या वास्तू, ते परिसर, तिथल्या विविध वयाच्या द्न्यात आणि अद्न्यात व्यक्ती, मित्र-मैत्रिणी, सुहृदपरिवार, कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ कनिष्ठ सहकारी, चित्रीकरणाचे आणि ध्वनीमुद्रणाचे स्टुडियो, मुंबईचा समुद्र, वरळी सीफेस, बांद्रा बेंड-स्टेन्ड, मुंबईच्या झगमगत्या आणि काळोखी रात्री, त्यातील चैतन्य, उन्माद आणि अपरंपार भयही ...
हेमिग्वेच एक सुंदर पुस्तक आहे...मुव्हेबल फीस्ट ह्या नांवाचं.. त्याच्या ऐन तारुण्यातील पेरिसच्या आठवणी त्यांत त्यानं लिहिल्या आहेत. त्या पुस्तकाचं हे सुंदर शीर्षक हेमिंग्वेच्या एका खाजगी पत्रातून घेतलं. आहे. ते वाक्य एखादी कवितेची ओळ रहावी तसं माझ्या स्मरणात कोरलं गेलं आहे. माझं इंग्रजी आणि एकूणच व्याकरण ह्या गोष्टींचा अगाध आनंद आहे. पण त्याच्या ह्या वाक्यरचनेत काही गडबड आहे कां असं मला एकीकडे वाटतं. आणि तरी ते लयदार वाक्य मला आहे तसंच आवडतं. तो म्हणतो
If you are lucky enough to have lived in Paris
as a young man,
then wherever you go for the rest of your life,
it stays with you,
for, Paris is a Moveable Feast..
माझे मुंबईतले ऐन उमेदीचे दिवस आठवले की मला हे वाक्य न चुकता आठवतं. ते पुस्तक सपवताना आलेलं एक छोटंसं वाक्य तर मला माझं आणि देबू, प्रदीप, राजू, सुहास, बाबा,अरुण ह्या आम्हा दोस्त कंपूचं मनोगत वाटतं.
Those were the days, when we were very young
very poor and very happy..
वाचक मित्रानो, घाबरू नका. मला मुंबईची बरोबरी पेरिसशी करायची नाहीये. माझ्या मुंबईतील आठवणी वेगळ्या आणि ते मुव्हेबल फीस्ट निराळं.
.. आणि शिवाय,
मी तरी अर्नेस्ट हेमिंग्वे थोडाच आहे ?
*****************
तसं पाहिलं तर मुंबईमध्ये माझा राहण्याचा प्रश्न खूप बिकट नव्हता. दादा-वहिनी खारला होते. मोठी बहीण हेमाताई (श्रीखंडे) विलेपार्लेमध्ये.. पण तरीही मुंबापुरीत माझे कमी-अधिक मुदतीचे अनेक मुक्काम झाले. .कारण कां कुणास ठाउक, पण मुंबईमध्ये कायमचं घर करायचं नाही असं मी जणू माझ्याही नकळत ठरवलेलं होतं. मात्र त्याचबरोबर ते सगळे मुक्काम ठराविक मुदतीचे असले तरी ती मुदत संपली तरी मध्ये फारसा अवकाश न जाता पुढच्या मुक्कामाचं नवं अवकाश जणू माझी वाटच पहात असायचं. वडाळा, वरळी सी फेस, केडेल रोड, बांद्रे (पूर्व),, प्रभादेवी, डी.एल.वैद्य रोड, दादर, शिवाजी पार्क, गोरेगांव पूर्व ही त्यातली ठळक नांवं.. ह्याखेरीजही जोडलेली नाती आणि त्यातून मिळणारा लोभ ह्याबातीत अस्मादिक प्रथमपासून आजतागायत अंमळ भाग्यवानच.
१९७४ मध्ये कवी म्हणून केलेला पहिला चित्रपट. राजा शिवछत्रपती ..त्या निमित्तानं संगीत दिग्दर्शक वसंत देसाई ह्यांच्या शिवाजी पार्कवरील परिमलवर तळ पडलेला असायचा. एकदा तिथं भालचंद्र पेंढारकर आले होते. मुंबईतला पत्ता कोणता असं त्यांनी विचारल्यावर वसंतरावजींनी मी तोंड उघडायच्या आत त्यांना, ‘परिमल, शिवाजी पार्क, असं परस्पर उत्तर देउन टाकलं होतं. पुढे हा खेळ सावल्यांचा, जानकी, संसारच्या निमित्तानं गीतनिर्मितीच्या बैठकी झडत होत्या ..तेव्हां अशाच एका चौकशीला ह्रदयनाथ मंगेशकर परस्पर सांगते झाले, प्रभूकुंज, पेडर रोड... आणि सुधीर फडके तथा बाबूजीनीही एकदा शंकरनिवास, शिवाजी पार्क, रस्ता, क्रमांक ३ हा माझा पत्ता म्हणून सांगितला. आणि खरोखरच ते तर सर्वार्थानं माझं निवास्थान होतंच. . कांम असताना आणि नसतानाही कितीतरी काळ मी त्या घरांत फडके परिवाराचा सदस्य म्हणून व्यतीत केला आहे. ही सर्वाना ठाउक असलेली नांवं झाली..पण ह्या पलीकडेही अनेक घरं मुंबईत अशी होती की ज्याची दारं माझ्यासाठी दिवसाच्या कुठल्याही प्रहरी स्वागताला सज्ज असायची.
मुंबईत राहू लागल्यावर काही दिवसातच मला एक मजेदार अनुभव आला होता. प्रथम ती जाणीव मला झाली तेव्हां माझं मलाच आश्चर्य वाटलं होतं. तेव्हां खरं तर माझं अधिकृत घर (भाड्याचं कां होईना) पुण्यातील भोंडे कॉलनीत होतं. तिथं चक्क माझी वाट पहाणारे आईवडील होते.. पुण्यातही दोस्तपसारा मजबूत होता. शिवाय माझं आवडतं दुसरं घर म्हणून फर्ग्युसन रोडवरचं केंफे डीलाईट होतं. त्या तुलनेत मुंबई खरं तर काहीच्याबाही अफाट आणि अनोळखी होती. पण तरीही मुंबईत प्रवेश केला की एकदम मला खूप सुरक्षित वाटू लागायचं. ह्या अजब मानसिकतेचं मला फार नवल वाटायचं ..पुढे हळूहळू ह्या कोड्याचा आपसूक उलगडा होत गेला. कारण प्रत्येक शहराचा, गावाचा स्वत”चा असा एक स्वभाव असतो. तसा मुंबईचाही एक स्व-भाव आहे...
मुंबई सर्वार्थानं सर्वसमावेशक आहे. मुंबईच्या ह्या सर्वसमावेशकतेचं एक अगदी जितंजागतं प्रत्यंतर तुम्हाला लोकलच्या प्रवासात केव्हाही पहायला सापडेल. माणसांनी भरभरून ओसंडणारी लोकल स्टेशनवरून हलून वेग पकडू लागते. तेव्हांही काही माणसं धावतपळत ती धावती लोकल पकडायचा प्रयत्न करतात. तर डब्यातली अगोदर लटकणारी माणसं त्यांना कमरेत हात घालून अलगद आंत घेतात. दररोज देशातील सर्व दिशांकडून येणा-या गाड्यातून अगणित माणसं मुंबईत ओतली जातात आणि ती पहाता पहाता मुंबईच्या गर्दीत सामावूनही जातात. काम करायची तयारी असलेल्या कुणालाही मुंबई फारकाळ उपाशी ठेवत नाही. तिला मायपोट म्हणतात ते उगीच नाही. जगण्याच्या पातळीचे जितके म्हणून थर म्हणावे ते सारे मुंबईत आहेत.. उलट काही थोडे अधिकच असतील. पण त्या सर्व थरांना लागणा-या अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत सोयी मुंबईमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्या सर्व क्षुधाना इथे खाद्य आहे. फक्त त्याच्यामध्ये जगण्याची विजिगीषा हवी.. मैदानमें गर हम डट जांये, मुश्किल है कि पीछे हट जांये हे न्रीदवाक्य स्वत:मध्ये बाणवून जो जगेल त्याला मुंबई छप्पर फाडके देउ शकते, त्यातले अपवाद गृहीत धरूनही ..
इरावती कर्वेचं परिपूर्ती हे पुस्तक माझं खूप आवडतं आहे. त्यातही त्यातला वेड लागलेलं घर हा लेख. घरात पोरांचा चालणारी बेफाम धावपळ आणि आईचा धास्तावलेला जीव.. अरे नंद्या, तो टेबलाचा कोपरा तुझ्या डोळ्यात घुसेल, संभाळ ,,तेव्हढ्यात, तो कोपरा हळूच स्वत:ला आंत घेतो. अग, तुझं डोकं भिंतीवर आपटतंय म्हणावं तोवर ती भिंतच स्वत:ला आक्रसून घेते.. त्या पुढे म्हणतात, दंगेखोर पोरांना आपलं घरच सांभाळून घेत असतं. मुंबई हे माझ्या दृष्टीनं असंच वेड लागलेलं महानगर आहे.
मुंबईच्या आठवणी सांगायच्या ठरवल्या तर आयुष्य संपुन जाईल कदाचित, पण आठवणी संपणार नाहीत. मात्र त्यातली एक अगदी साधी पण मजेदार आठवण आत्ता सांगाविशी वाटते आहे. ती फार काही प्रातिनिधिक नक्कीच नाही. कारण ती पूर्णपणे माझी व्यक्तीगत आठवण आहे. पण तरीही ही ऐकून आणखी कुणाला, विशेषतः माझ्यासारख्या फ्री लान्स आयुष्य मुंबईत जगलेल्या व्यक्तीला अशाच प्रकारचे समांतर अनुभव आठवले, तर मला नवल वाटणार नाही.. कारण, मुंबईचे माझे दिवस एकूण काय आणि कसे होते ह्याची एक झुळूक म्हणावी अशीच ही आठवण आहे. प्रीतीवांचून मरावे हेची असेल प्राक्तन, प्रीतीवांचून जगेन हे माझं गाणं रेकॉर्ड झालं, त्या दिवशीची ही गोष्ट आहे. मुंबई दूरदर्शनवर अरुण काकतकर करीत असलेल्या एका दिवाळी कार्यक्रमासाठी ते गाणं मी केलं होतं.. कवी आणि संगीतकार ह्या दुहेरी नात्यांनी.. गायिका होती देवकी पंडित, वय वर्षे १२ ..त्या वेळी मी शिवाजी पार्क भागातील डी. एल. वैद्य रोडवर अरुण काकतकरच्या घरीच रहात होतो. सकाळी दूरदर्शन केद्रावर जायची तयारी करीत असताना लक्ष्यात आलं की आपल्या पाकिटात पैशाचा ठणठणाट आहे.. घाबरून जायचा प्रश्न नव्हता कारण ही नवी गोष्ट नव्हती आणि घाबरून काहीच होत नाही हे एव्हाना पुरतं पटलेलं होतं. शिवाय आपल्या खिशातून जाणारा पैसा आपल्या आयुष्यातला शेवटचा पैसा आहे असा धाक मला कधीच वाटत नव्हता. मधून मधून ही मध्यंतरं येत रहायची पण त्यांच्या अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी कां होईना पैसाही येत-जात रहायचा .. शिवाय, मुंबईतील त्या संघर्षकाळाच्या सलामीलाच माझ्या दोस्तांनी मला पढवलं होतं. मुंबईत आपण एकत्र कां राहतो तर प्रत्येकावर वेळ येत असते म्हणून.. तेव्हां ती आली की पडेल ती मदत करायची आणि घ्यायचीही .. तेव्हां टी.व्ही त गेल्यावर अरुणकडून गरजेपुरता श्वासोच्छवास मागून घेउ असं मनाशी म्हणून मी मार्गस्थ झालो.
शूटिंग, रेकॉर्डिंग, रिहर्सल ह्या गोष्टीच अशा आहेत की त्यांत घुसलं की मग इतर काही भानच रहात नाही.. सकाळी १० ते ४ वेळ कसा गेला कळलंच नाही. गाणं मस्त पार पडलं. गाण्याचे शब्द आणि गायिकेचं वय ह्या गोष्टी भलत्याच व्यस्त होत्या. त्यामुळं आरंभी भोवतालची मंडळी अंमळ साशंक होती. पण तिचं वय लहान असलं तरी आवाजातली मूलभूत परिपक्वता हेरूनच तर तिची निवड मी केली होती.. त्यामुळं मी तसा पूर्ण नि:शंक होतो. पण माझी ती नि:शंकता वास्तवातही सिद्ध झाल्यामुळे एकप्रकारचा सुगंधी माज अवघ्या अस्तित्वात दरवळत होता. त्या धुंदीत मी सर्व टीम घेउन टी.व्ही केटीनमध्ये गेलो. एव्हांना आर्थिक वास्तवाचा पूर्ण विसर पडला होता. मी रूबाबात प्रत्येकाला काय हवं असं विचारून नेहमीच्या संवयीप्रमाणे जोरदार ऑर्डर दिली. त्याचवेळी पलीकडच्या टेबलवर अरुणचे सहाय्यक राणे बसले होते. त्यांचं आधी लौकर आटपल्यामुळे ते आमचा निरोप घेउन निघाले. अगदी अनपेक्षितपणे काउंटरपाशी गेल्यावर त्यांनी त्यांच्या बरोबर आमचंही बिल दिल आणि मला ते दुरून खूण करून सांगितलं. पुढचा एक जाहीर अब्रूनुकसानीचा प्रसंग त्यामुळे आपसूक टळला हे खरं.. पण त्याचबरोबर दाहक वास्तवाचं भानही पुढे टोलवल गेलं ..
त्यादिवशी रेकॉर्डिंग ऐकायला मुद्दाम आमची वहिनी आली होती. ती डॉक्टर, त्यामुळे संध्याकाळी तिचं क्लिनिक म्हणून ती निघणार होती.. निघताना घरी येणार कां म्हणून तिनं विचारलं. अरुणला त्यादिवशी मीटिंग होती आणि मीही बरेच दिवसात घरी गेलो नव्हतो त्यामुळे मी वहिनीबरोबर निघालो..वरळी ते खार विनासायास घरी.. खिशाला हात लावण्याचे प्रसंगच जणू दूर दूर पळत होते. घरून ती क्लिनिकला निघाली. तेव्हां खरं तर तिनं येणार कां म्हणून मला विचारलं ..कारण साहित्य सहवासमधला माझा अड्डा तिला ठाउक होता. पण मी डौलात तिला, तू जां ..मी जरा नंतर निघणार आहे (हो ,पण कसा ?) असं सांगून बैठक आणखी ऐसपैस केली.
असा काही वेळ गेला आणि फोन वाजला. दूरदर्शनच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एक छान कॉफी कलरची साउथ इंडियन नवी मैत्री झाली होती. ती आणि तिचं घर खरोखरच अगत्यशील होतं. फोन तिचा होता. तिच्या घरी काहीतरी छोटा घरगुती कार्यक्रम होता. म्हणून ते निमंत्रण करणारा तो फोन होता. मी अर्थात नेकी और पुछ पुछ ? अशा थाटात पोचतो तासाभरात असं सांगून फोन ठेवला ..खिशात हात घातला आणि चटका बसला. इथं बाहेर डोकं काढण्याची मारामार आणि सायनपर्यंत कसला जातोय..?. तिचा फोन स्मरणात नसल्यामुळे तिला कळवण्याचा प्रश्नच नव्हता.. नेमकं काय करावं न सुचून प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा साहित्य-सहवासमध्ये राजूला फोन फिरवला. राजू आमचा जिगरी दोस्त. दिनकर साक्रीकरांचा मुलगा. आता तोही घरी नसेल तर ?.. आत्महत्येचे ९९९ सुलभ मार्ग नामे निराकार पुस्तकाचे चिंतन सुरू करावे. पण नाही, अजून इहलोकीचे अवतार-कार्य संपले नसावे.. कारण फोन चक्क राजूनेच उचलला. आणि प्रफुल्लीत स्वरात, अरे काय करतोयस, ये की इकडे म्हणून सांगितलं. (आज फिर जीनेकी तमन्ना है, आज फिर मरनेका इरादा है ..वगैरे) मी एकच वाक्य बोललो.. लगेच निघतो टेक्सी करून.....पण तू जरा खाली उतर ..(कळण्याचा चाले कळण्याशी संवाद हे कविवचन फक्त मैत्रिणीपुरतंच नाही बरं..).. अल्पावधीत इष्ट स्थळी पोचलो. राजू साहित्य सहवासच्या फाटकात उभाच होता. त्यानं माझी सोडवणूक करून वर घरी नेलं. मी त्याला सायन-निमंत्रण सांगून ते सहमित्रपरिवार असल्याची ग्वाही दिली. पण त्याचेही खिसे त्याला धोक्याचे अलार्म देणारे होते. . जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ही शिकवण पुरती बाणलेली असल्याने आम्ही लगेच प्राप्त परिस्थितीत शक्य असलेल्या योजना आखायला सुरुवात केली. तेव्हढ्यात.. .राजूच्या बाबांचा म्हणजे दिनकर साक्रीकाराचा घरात नाट्यमय प्रवेश. (तसे तेही आमचे ज्येष्ठ मित्रच. म्हणजे राजूचेही) त्यांचे ते नाट्य-संजीवक अमृतमधुर शब्द .. अरे मी माटुंग्याला निघालोय. तुम्हाला कुठे सोडायचं आहे कां ?.. आम्ही ताडकन उभे...
तात्पर्य, आमचं सायन, तलम डोसा, माझ्या आयुष्याचा केवळ प्राणवायू असलेली अस्सल फिल्टर कॉफी ..सारं काही साग्रसंगीत .. पुन्हा रस्त्यावर आलो तेव्हां राजू एकदम म्हणाला .. देबूकडे जाउया कां ? देबू प्रभादेवीला रहायचा ..(पण तो असेल का ? असले दळभद्री संदेह एव्हाना पुरते जमीनदोस्त झाले होते. .) मी त्याला होय म्हणतोय तोंवर मुद्दाम बोलवावे तशी समोर.लालभडक तजेलदार ८५ लिमिटेड उभी. ..आवडता वरचा डेक ..काही क्षणांत प्रभादेवी. दारात देबू.. वाटच पहाणारा.. अल्पावधीत आम्ही योग्य स्थळी प्रस्थापित. मध्ये जी असावी ती सामुग्री ..गप्पा, हास्यविनोद, .. सगळी मुव्हेबल फीस्ट मागील पानावरून पुढे चालू.... खिशातील मोकळं पाकीटही माझ्याइतकंच तृप्त ..सैलावलेलं ..
रात्री अंथरुणावर पाठ टेकताना
जुनीच शब्दयोजना नव्या अर्थानं
अंत:करणपूर्वक ओठावर आली .
Hats off, बम्बई मेरी जान..