Sunday, 11 September 2011

स्वगत संवाद - १०

मागच्या आठवड्यात अचानकपणे उगारला जाउन आलो.  आमच्या लहानपणी सहलीला जाण्याची जी काही पेटंट ठिकाणं होती त्यामध्ये उगार ह्या कर्नाटकातील गावाचा नंबर बराच वर लागतो. उगारचा साखरेचा कारखाना पहाणे आणि तिथूनच पुढे गोकाकचा धबधबा आणि मुख्य म्हणजे तिथला झुलता पूल पहाणे आणि मग परत आल्यावर माझी गोकाकची सहल हा निबंध लिहिणे ही सक्तीची  शिक्षा भोगणे ह्याला काही पर्याय नव्हता.  आमचा गांव किर्लोस्करवाडी आणि हे उगार शुगर वर्क्स ह्यांच्यात काही एक वेगळीच जवळीक होती.  कारखाना, सोशल क्लब, महिला मंडळ, शाळा ह्या सर्व पातळ्यावर ही देवाणघेवाण अखंड चालायची ..  पण त्यातील सर्वात मोठा दुवा म्हणजे उगार आणि किर्लोस्करवाडी ह्यामधली क्रिकेट मेच . ह्या क्रिकेट संदर्भात बहुधा प्रफुल्ल शिरगांवकर हे नांव लहानपणापासून खूप जवळचं झालं होतं.. पण त्यांची खरी प्रत्यक्ष भेट आणि ओळख गेल्या वर्षी किर्लोस्करवाडीच्या शतक महोत्सवाच्या वेळी झाली,ती आमचा दोघांचा समान दोस्त विजय जांभेकर ह्याच्यामुळे आणि त्या नव्या ओळखीला  खरा उजाळा मिळाला ह्या नुकत्याच झालेल्या उगार-भेटीमुळे.  अगदी अकल्पितपणे प्रफुल्लजीन्चा फोन आला.  उगार शुगर वर्क्सच्या जिमखाना डे ला चीफ गेस्ट म्हणून येणार का ?  माझ्याही नकळत मी हो कधी म्हटलं ते मलाही कळलं नाही. हा बहुधा ह्या जुन्या ऋणानुबंधाचा परिणाम असणार.. पण एक खरं की ही पुनर्भेट खूप सुखाची आणि आनंदाची ठरली.

एकतर तो सम्पूर्ण  दिवसभर जिमखान्याच्या मोठ्या मैदानावर विविध खेळ पहाताना आणि काही वेळा चीफ गेस्ट म्हणून थोडा सहभागही देताना (होय बरे होय) मी पुन्हा लहान होऊन वाडीच्या दिवसात गेलो होतो.. एरवी ह्या प्रकारे भूतकाळात जायला आणि त्यासाठी पुन्हा एकदा लहान वगैरे व्हायला मला फारसं आवडत नाही.. कारण खरोखर लहान होतो तेव्हांही  मला केव्हा एकदा मोठे होतोय अशीच घाई झाली होती. पण तो दिवस मात्र अपवाद ठरला.. कारण आपल्या गुलझारसाहेबांची आठवण काढत क्षणाक्षणाला मी फ्लेशबेकमधे जात होतो.

मैदानावरचे खेळ संपल्यावर जिमखाना हॉलमध्ये प्रामुख्याने अधिकारी पुरुषवर्गासाठी काही मजेदार इन-डोअर सांघिक खेळ होते. (प्रमुख पाहुण्यांचा सहभागही ओघानं आलाच.)  त्यामध्ये एक वेगळा,  स्त्रियांच्या संगीत खुर्चीसारखा खेळ होता. निदान मला तरी तो अनोळखी होता.   उपस्थित पुरुषांची समान संख्या असलेया ५/६ टीम मध्ये विभागणी केली होती.  ते गट मध्यभागी ठेवून चारही बाजूला चार एअरपोर्टचे फलक उभे केले होती.  बेळगाव, बेंगलोर, कोल्हापूर आणि गोवा .. माग संगीत सुरू झालं की सर्व गट एकामागोमाग लाईन धरून ते वर्तुळ फिरू लागत. म्युझिक थांबलं की ज्याला जो हवा असेल त्या फलकापाशी थांबायचं ..  त्यातील एक फलक रद्द केला जायचा की एक गटच्या गट बाद. ..की पुन्हा संगीत सुरू आणि पुढची फेरीही सुरू.  एकूण संख्येच्या प्रमाणात एकेक फलकही रद्द होत होता..शेवटी दोन फलक आणि दोनच व्यक्ती उरल्या आणि फायनल निकाल लागून  खेळ संपला..  मजा आली.  ही सर्व संकलपना आणि कार्यवाही सौभाग्यवती शिरगांवकर  आणि त्यांच्या स्त्री सहकारी ह्यांनी संचलित केली.  एकूण दिवस धामधुमीत आनंददायी गेला.  तो दिवसभर उगार आणि किर्लोस्करवाडीमधले अनेक समान धागे मला जाणवत होते. पण त्यातला एक धागा अगदीच अनपेक्षित होता. 

सकाळी खेळ सुरू होण्यापूर्वी आधी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पण तो ध्वज तो आपला नेहमीचा तिरंगा नव्हता..  तो खास वेगळा स्पोर्ट-फ्लेग म्हणजे क्रीडा-ध्वज होता.  सामूहिक ध्वजवंदन चालू असतांना मागे एक ध्वज-गीत गाईलं  गेलं. ते गीत रचणारे, स्वरबद्ध करणारे आणि गाणारे गृहस्थ स्थानिक कीर्तनकार होते.  ते साधुसुधे  शब्द आणि स्वर ऐकताना पुन्हा मी नकळत वाडीमध्ये गेलो. 

१५ ओगस्ट १९४७ ला किर्लोस्करवाडीमध्ये जो पहिला स्वातंत्र्यदिन-सोहळा थाटामाटात साजरा झाला त्याचाही शुभारंभ अशाच एका अनोख्या ध्वजगीताने झाला होता.    आजही ते ध्वजगीत  प्रत्येक वर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला वाडीमध्ये गाण्याची प्रथा किर्लोस्करवाडीमध्ये गेली  ६०/६५ वर्षे चालू आहे आणि पुढेही चालूच रहाणार आहे. 

योगायोग असा की त्याचे कवी रांम गणेश मोघे हे एरवी वाडीच्या कारखांन्यामधील नोकरदार पण व्यक्तिधर्माने आपादमस्तक कीर्तनकार (आणि शिवाय आमचे वडीलही)  आणि त्यांच्या सुंदर काव्याला अत्यंत वेधक आणि चैतन्यदायी स्वर देणारे आमचे तेव्हाचे गायन शिक्षक श्री. मांणगांवकर ह्या दोघांची ही निर्मिती होती.  त्याना भाग्यवान म्हणायला हवं ..कारण आपली कलाकृती आपल्या मागेही अखंड गाजत आणि वाजत राहण्याचं असं दुर्लभ भाग्य किती जणांच्या वाट्याला येतं ? लय ह्या कविता संग्रहात्ली  माझ्याच एका छोट्याशा कवितेतल्या दोन ओळी आठवतायत ..

               अर्धाच सोडुनी खेळ जायचे अंती
.               ध्वज नाचत राहील
               कुणाकुणाच्या हाती

गोष्ट खरीच आहे. त्या गीताचे दोन्ही निर्माते कधीच काळाआड गेले. पण पण १९४७ ते २०११ मधल्या शालेय मुलामुलीच्या  किती पिढ्या हे गीत गात राहिल्या आणि पुढच्याही गात रहाणार आहेत..तर अशा त्या भाग्यवान गीताची चाल कशी होती ? ती इथं लिहून कशी दाखवणार म्हणा.. पण मग निदान त्या काव्याचे शब्द काय होते ? आणि एकूणच त्या कलाकृतीची निर्मिती कथा ? 

             सांगू यां ..तीही सांगूया
                     पुन्हा केव्हातरी ..
                              लौकरच
                 कदाचित उद्या- परवासुद्धा ...

No comments:

Post a Comment