Saturday, 3 September 2011

स्वगत संवाद - ९

हा स्वगत संवाद नामक ब्लॉग लिहू लागलो ह्यामुळे एकूणच छान वाटतं आहे.  मुख्य म्हणजे लगेच  वाचकांच्या प्रतिक्रियाही  येउ लागल्या. त्यातील आजच आलेल्या एका अभिप्रायानं आजचं हे लेखन करायला मला प्रवृत्त केलं आहे.  आजचा माझा स्वगत संवाद हा माझ्या ह्या स्वगत संवाद लिहिण्याविषयीच आहे.  तेव्हां मित्र प्रदीप वैद्याना त्यांच्या  मर्मग्राही  प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद देउ इच्छितो.  त्यांची प्रतिक्रिया इथं सांगण्यापूर्वी मी मुळात हे ब्लॉग लेखन करण्याकडे कां आणि कसा वळलोय  ते आधी सांगतो.

गेली काही वर्षं माझा हळूहळू गद्य लेखनाकडे ओढा वाढत चालला आहे. निरंकुशाची रोजनिशी, गाणारी वाट, स्वच्छंद, गाण्यांचे चांदणे अशी काही वृत्तपत्रातील सदरं मी लिहिली. त्यांना सुरेख प्रतिसाद मिळाला.  मेनका मासिकात एक वर्षभर संकल्पनां आणि आविष्कार हे मी आजवर केलेल्या रंगमंचीय प्रयोगांची निर्मिती प्रक्रिया सविस्तर सांगणारं  लेखनही मी केलं.. .तर अनुबंध हे पुस्तक मी थेट समग्र पुस्तकस्वरूपातच  लिहिलं.  त्याच प्रकारचे आणखीही काही लेखन-संकल्प मनांत आहेत.  त्यातील काही  लेखन चालूही आहे.  आणि हे असं असूनही ब्लॉग ह्या एका वेगळ्या दिशेनं मला अगदी नकळत स्वत:कडे खेचून घेतलं आहे. 

लेखनाच्या निमित्ताने संगणक, मग इंटरनेटचं अथांग विश्व आणि मग ओघानंच ई मेल, वेब साईट, फेस बुक, ब्लॉग ह्यांची तोंडओळख, असा कुणाचाही होतो तसाच माझाही प्रवास झाला.  त्यातली ई मेल रोजच्या आयुष्यात सामावून गेली. ह्यापूर्वी पत्रव्यवहार ह्या प्रकाराची माझ्याकडून अक्षम्य आबाळ  झाली होती.  कळतं पण वळत नाही, असा तो प्रकार होता.  आधी पत्र लिहिणे, मग नंतरचे पाकीट-तिकीट-डिंक इत्यादी सोपस्कार करून आठवणीने टपाल पेटीत टाकणे,(ही टपाल पेटी कुणी कधी उघडतं कां ? ह्या छळवादी प्रश्नाची मुस्कटदाबी करून ) ..मग ते पत्र कधी ई ई ई ई ई तरी पोचेल अशी आशा करणे आणि मग साहजिकच उत्तराची वाट पहात राहणे  हा सगळा प्रकार एकूणात आपल्या उत्साहाची (उत्साहाने) वाट लावणारा आणि त्यामुळे एकूणच    असहय ... त्यापेक्षा हे काहीच न करणे आणि कळण्याचा  चाले कळण्याशी संवाद ह्या ओळीवर विसंबणे हे मला अधिक मांनवायचे. .. पण आता ह्या ई मेलनं किमयाच केली आहे.. दोन चार ओळीत मन मोकळं करायचं आणि एक क्लिक की एकदम क्षणांत साता समुद्रापार. बरं, सोबत तत्काळ पत्र गेल्याची (आणि पोचल्याचीही) पावती आणि कधी कधी तर उलट उत्तरही.. आणि हा सगळा लक्ष योजनांचा प्रवास ज्ञानदेवाच्या भाषेत,  आपुला ठावो न सांडीता (म्हणजे आपली जागा न सोडता).. पण ह्या ई मेल प्रकाराच्या तुलनेत बाकीच्या ह्या इतर प्रकारांच्या जवळ मी जरा आस्ते आस्ते जातो आहे.

ह्यापैकी माझी  वेबसाईट मी नुकतीच करायला टाकली आहे. (शिंप्याकडे प्यांट शिवायला टाकतात, तसं वाटतं ना हे ? पण वेब साईटसुद्धा शिवायची नसली तरी विणायची असतेच ना.. ) फेसबुक हा प्रकार मला तसा फारसा जवळचा नाही वाटला. माझा एक  मित्र त्याला चावडी (की चावडीसमोरचा पार ?) म्हणतो.  हा अर्थ गृहीत धरला तर पारावर बसून आल्या गेल्या गोंडस चेह-यांना ह्टकण्याचे दिवस मागे पडले आणि तेच चेहरे किलकिल्या डोळ्यांनी फुटक्या भिंगातून निरखण्याचे दिवस अजून दूर आहेत (आणि ते तसे दूरच असोत) ..पण तरीही ह्या  फेसबुक नामे चावडीवर माझी अप्रत्यक्ष  हजेरी डॉ. अमित करकरे ह्या तरूण मित्रामुळे लागतेच. पण ब्लॉग हया प्रकाराविषयी मात्र मला अनाकलनीय दूरस्थ आकर्षण कधीपासून वाटत आलं आहे. हा ब्लॉग म्हणजे नक्की काय आणि तो कशाशी (कशासाठी?) खातात ह्याचा कणभरही पत्ता मला नव्हता आणि खरं तर आजही नाही , तरीही.. आजमितीला  माझं त्याच्यापर्यंत येणं घडतंय ते माझ्या एका तर्क-विचार पद्धतीतून कुठलाही कलाकार केवळ स्वांत:सुखाय आपले आविष्कार करीत नसतो. रसिकांची दाद हेच त्याचं एक लक्ष्य आणि टोनिकही असतं.  त्याचेही दोन प्रकार.. एक म्हणजे, सजीव आविष्काराची थेट सामूहिक दाद.  तिची किक काही औरच.  तसा परफोर्मर अंगात पुरेपूर भिनलेला असल्यामुळे तीही दाद मी पोटभर अनुभवलीय आणि अनुभवतोय. पण दुसरी एक अप्रत्यक्ष दाद, जी प्रामुख्याने लेखनातून मिळते तिची  ओढ मला काकणभर अधिक आहे.   आपण एकांतात एकटेच आपलं मन शब्दात उकलत बसतो. समोर कुणीही नसतं.. मग ते दूर दूर कुणा रसिकाच्या हाती पडतं.  तोही एकट्यानेच एकांतात त्याचां आस्वाद घेतो आणि क्षणांत आपल्याशी जोडला जातो..  बहुतेक वेळी आपल्याला कळतही नाही .. पण कधीतरी  योगायोगाने तो आपल्या पर्यंत पोचतो आणि तेव्हांचा आपला आनंद केवळ अवर्णनीय असतो. .दैनिक साप्ताहिकातली सदरं, मासिक नियतकालिकातील लेखन, पुस्तकरूपानं होणारं प्रकटीकरण ह्या सगळ्या माध्यमांचा ह्यात समावेश आहेच. किंबहुना इतके दिवस तोच एक अधिकृत मार्ग लेखकांना होता.   पण तिथंही मध्ये गाळणी असतात, संपादक, प्रकाशक ..त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या व्यावहारिक अडचणी, शब्दमर्यादा...नेहमी वाटायचं,  असं मध्यम पाहिजे की जिथे आपल्याला मनसोक्त व्यक्त होता यावं आणि ते मध्ये कुणीही न येतां थेट रसिकांनी स्वीकारावं किंवा नाकारावं.. दोघांचेही एकमेकांना दडपण नाही.  तुम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य ..त्यांना वाचण्याचं किंवा न वाचण्याचं स्वातंत्र्य  दोघेही आपल्या मनाचे राजे.  हा धूसर विचार खूप दिवस, खरं तर वर्षं मनांत तरळत होता.  संगणक, इंटर नेट आणि ब्लॉग ह्यांनी तो साक्षात साकार केला आहे. 

परवा कुणीतरी म्हटलं की ज्याचं कुणीही प्रकाशित करत नाही.. त्यांची ही सोय आहे. असेलही..  पण तितकंच ते नवं अंगण आहे, अखंड उलगडत जाणा-यां क्षितिजापर्यंत तुम्हाला नेणारं ..ते उद्याचं एक नवं आकाशही असेल, जे  तुम्हाला वरची सात आकाशं खुली करेल... उत्तर पेशवाईत शाहीर प्रभाकर म्हणून गेलाय.  ज्या दिशेस ज्याचा रोख ती त्याला मुभा.. स्वगत संवादच्या दुस-यां लाटेत मी काय लिहिलं होतं, आठवतंय ना ? कवी स्वप्न पहातात आणि वैज्ञानिक ते साकार करतात.  तेव्हां हे लेखन म्हणजे विसाव्या शतकात जन्मलेल्या-वाढलेल्या  कवीची एकविसाव्या शतकाला  दिलेली ही दाद मानायला कुणाची हरकत असणार ?

पण आजचं लेखन इथं संपत नाही.  ज्यामुळ हे लिहिणं प्रेरित झालं ती प्रदीप वैद्यांची प्रतिक्रिया माझ्या मानसिकतेच्या जणू मर्मावरच भेट ठेवणारी म्हणावी लागेल.  झालं काय ..मी आंतरिक प्रेरणेनं ब्लॉग लिहू लागलो खरा..पण मनावर दडपण होतं.. किंवा आहेसुद्धा..  हा नवा लेखन प्रकार, खरंतर नवीन  लेखनप्रयोग हाताळताना काय लिहावं, कसं लिहावं किती लिहावं ? ..म्हणजे सदर लेखनात मी संपादक प्रकाशकांकडून पडणा-या शब्द-मर्यादेविषयी बोललो. ते दडपण मीही घेतोच आहे. ते  केवळ दडपणही नाहीये. गोष्टीवेल्हाळपणाची खुमारी मला नुसती ठाउकच  नाही, तर छान अवगतही आहे.  पण म्हणून पाल्हाळ लावून चालणार नाही.  आणि खोल मनांत नेमकेपणा आणि अल्पाक्षरी आविक्ष्काराची ओढ आहे. पण म्हणून लेखन त्रोटकही होता कामा नये.. ह्या द्विधा अवस्थित माझी अंमळ कोंडीच होत होती.

प्रदीपनी नेमकं त्यावरच बोट ठेवलं.  त्यांनी नेमकं काय म्हटलं  आणि मला ते कसं किती कळलं ह्याची प्रचीती संवेदनशीलजाणकार वाचकांना हया लेखातूनच येईल ही खात्री आहे.  पण माझ्या अनाहून अद्न्यात वाचकांनाही हे सगळं वाचून काय वाटतंय  तेही जाणुन घ्यायला मला आवडेल..

                आणि म्हणून आजचा हा स्वगत संवाद ,
                     खुद्द स्वगत संवादाविषयीच.. 

1 comment:

  1. "आपण एकांतात एकटेच आपलं मन शब्दात उकलत बसतो. समोर कुणीही नसतं.. मग ते दूर दूर कुणा रसिकाच्या हाती पडतं. तोही एकट्यानेच एकांतात त्याचां आस्वाद घेतो आणि क्षणांत आपल्याशी जोडला जातो.. बहुतेक वेळी आपल्याला कळतही नाही .. पण कधीतरी योगायोगाने तो आपल्या पर्यंत पोचतो आणि तेव्हांचा आपला आनंद केवळ अवर्णनीय असतो."

    मस्तच! किती छान शब्दांत मांडलंय...

    ReplyDelete