मला वाटतं, आता उगीचच अनावश्यक फुटेज खाण्यापेक्षा आज त्या ध्वजगीताचीच गोष्ट सांगून टाकावी, हे अधिक बरं. नाही कां ? तशी त्या गीताची गोष्ट अगदी छोटी आहे. पण त्याच्या मागेपुढे जे संदर्भ आहेत ते महत्वाचे आहेत. माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या संदर्भात आणि एकूणातही.
पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा उल्लेख मी आत्तापर्यंत केला तसा ध्वजगीत म्हणून कधीच झाला नाही आणि होत नाही. त्याला समस्त किर्लोस्करवाडीकर ध्वजाची आरती म्हणतात. त्यामुळं की काय वर्षानुवर्षे ती आरती गायली जात असताना सुवासिनी स्त्रिया हातात आरतीचं तबक घेउन ध्वजासमोर उभ्या असायच्या ..जुनी कृष्ण धवल छायाचित्र आजही ह्याची साक्ष देतात.. किर्लोस्कर उद्योग आणि गांव ह्यांच्या शतक महोत्सवानिमित्त मला एक अनुबोधकथापट करायची संधी गेल्या वर्षी मिळाली ..त्याचं शीर्षक आहे, आधी बीज एकले त्या चित्रपटात ही छायाचित्र पहायला मिळतात... तर ह्या गाण्याचे मूळ निर्माते कवी रांम गणेश मोघे आणि संगीत दिग्दर्शक माणगावकर मास्तर ह्या दोघाविषयी आधी थोडक्यात सांगायला हवं.
आमचे वडील जातिवंत कीर्तनकार होते. हे म्हटल्यावर त्यांच्यामध्ये कवित्व असणं हे ओघानंच आलं. पण त्यांचं ते कवित्व केवळ कामचलाऊ नव्हतं, तर चांगली अभिजात बैठक असलेलं होतं. त्यांचा कवितेचा अभ्यास प्राचीन काव्यापासून ते आधुनिक काळापर्यंत अत्यंत विस्तृत होता. पण त्यांचं स्वत:चं कवी-व्यक्तीत्व हे प्रामुख्यानं कीर्तनासाठी होतं. शिवाय गांवाचे घटक म्हणून प्रासंगिक काव्यरचनाही त्यांनी खूप केल्या.. ही ध्वजाची आरती हा त्यातीलच एक भाग म्हणावा लागेल. मात्र त्यांच्यातील कवित्वाचा दर्जा अत्यंत सकस आणि मुख्यत: प्रामाणिक होता. उसनेपणाचा स्पर्शही त्यांना कधी झाला नाही. ते लिहायचे ते मनाच्या तळापासून लिहायचे. त्यांचा शब्दांचा साक्षेप समर्थ रामदास कवींच्या जातकुळीचा होता. त्याची साक्ष देणारं त्यांच एक काव्यवचन हया ओघात सांगतो. संधी हया विषयात ते म्हणतात..
संधी न येते बोलावूनी
संधी न राहते खोळंबूनी
संधी न लाभते, सहसा, फिरुनी
ध्यानी धरावे ..
ह्या जागी जर दुसरा कुणी विचाराची बैठक नसलेला उतावळा आग्रही कवी असता तर त्यानं संधी न लाभते कधीही फिरुनी असंच म्हटलं असतं .. पण मूलभूत विचार आणि वस्तुस्थितीची डोळस जाणीव असल्यामुळे वडिलांनी सहसा हा अत्यंत समर्पक शब्द वापरला आहे. आजकाल आपल्याला इंग्रजीमध्ये सांगितलं की अधिक नीट कळतं म्हणून सांगतो.. You will NEVER get the opportunity again हा आक्रस्ताळा आक्रमकपणा आणि You NORMALLY don’t get that again हे वास्तवाचं शहाणं भान हया दोन्हीतील सूक्ष्म छटा अवगत असण्याचा हा भाग आहे, ज्याला मी मघाशी शब्दांचा साक्षेप म्हटलं.
आपल्या तिरंगी राष्ट्रध्वजाची ही आरती हा त्यांच्या अभिजात कवित्वाचा साक्षात प्रत्यय देईल. एकतर, कविवर्य गदिमांची अशोक-चक्रान्कीता ही कविता हा एकमेव नितांत सुंदर अपवाद वगळता मराठीत ध्वजस्तवन करणारं एकही अन्य उदाहरण निदान माझ्या तरी माहितीत नाही. पुन्हा ह्या संदर्भातही एक तपशील ध्यानांत घ्यायला हवा. गदिमांनी ते गीत १९६२ मध्ये चीन-भारत युद्धाच्या वेळी लिहिलं.. आणि रा.ग.मोघेंनी ही आरती १९४७ मध्ये पहिल्या स्वातंत्र्यदिनी लिहिली आहे. शिवाय त्यामध्ये ध्वजाच्या तीन रंगांमध्ये जो आशय शोधायचा प्रयत्न केला आहे तोही पहाण्यासारखा आहे... तेव्हां, आता ते कवितेचे शब्द पाहूया.
जय जय श्रीनवहिंदध्वजदेवा जय हो
शांतीची,सौख्याची जगी तू प्रतिमा हो
वरचा केशरी रंग द्योतक त्यागाचा
धवलोज्वल रंग मध्ये द्योतक धैर्याचा
खाली हिरवा शोभे द्योतक प्रगतीचा
चक्र निळे संस्कृतीचे दिव्यप्रेरक हो
नेत्री रूप तुझे, तव नाम धरून ओठी
कित्येकांनी दिधले प्राण तुझ्यासाठी
मान तुझा उंचावे जगताच्या हाटी
राष्ट्रध्वजसंधी तू सुयशे नेता हो
शांतीची, सौख्याची वृद्धी कर आता
मानवतेचे लाभो यश वैभव हाता
विश्वाच्या शांतीचा हो तूच प्रणेता
रांम दिसावा राष्ट्री..त्यां तू साधन हो ..
जय जय श्रीनवहिंदध्वजदेवा जय हो
वडिलांनी लिहिलेल्या ह्या गीताचे संगीतकार आहेत आमचे माणगावकर मास्तर, म्हणजे आमच्या शाळेचे म्हणजेच पर्यायानं अख्ख्या गावाचे गायन-शिक्षक. माझ्या गाणारी वाट ह्या पुस्तकात आरंभी अगदी बालपणीच माझ्या अस्तित्वात संगीताचा अमृतकण प्रथम पेरला गेला तो प्रसंग जरा मजेदार शैलीत लिहिला आहे. त्यांत कुठलेच नांव गांव इत्यादी तपशील दिलेले नाहीत.. पण त्यातले ते किर्लोस्करी लोखंडी खुर्चीवर अवघडून बसलेले, धोतर-कोट-टोपी ह्या पेह्ररावातले, बाभळीच्या खोडासारखी मुद्रा असलेले गृहस्थ म्हणजेच हे आमचे लाडके, माणगावकर मास्तर. त्यांची हार्मोनियमवरची नाचणारी फुलपाखरांसारखी चपळ बोटं पाहूनच तर मी घरातल्या वडलांच्या पेटीवर कुणाला नकळत हात टाकू लागलो. हया मास्तरांचं मोठेपण तसं आम्हाला खूपच उशीरा नीट समजलं. (पण तशी ती एकूण प्रथा किंवा परंपराच आहे, जगांत कुठेही).. पण तरी त्यांचं आमच्या त्या छोट्या विश्वापुरतं एक गलेमर आम्हाला नक्कीच होतं. संगीतकार, संगीत-दिग्दर्शन ह्या गोष्टींची जाणीवही नव्हती तेव्हापासून त्यांच्या अनोख्या चाली असलेली दोन गाणी आमची खूप आवडती होती.. एक म्हणजे, श्रीपाद कृष्णांचं सुप्रसिद्ध प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा .. त्या गाण्याची मूळची जी आजही गायली जाते ती सुप्रसिद्ध चाल तेव्हाही आम्हाला आजच्या इतकीच आवडती होती..पण तसं असूनही त्याच गाण्याला माणगावकर मास्तरांनी लावलेली वेगळी मधुर चाल ही जणू आमची मर्मबंधातली ठेव होती. आणि तशीच ही दुसरी चाल.. तिरंगी ध्वजाची आरती...
जसजसा मोठा होत गेलो तशी ती स्वररचना मला अधिकच आवडू लागली.. इतकंच नव्हे तर निरंतर कुतूहलाचा विषय बनली. आजही जुनी वाटू नये अशी ताजगी त्या स्वरांना लगडली आहे. स्वत: गीत-संगीत-विश्वांत विहार करू लागलो, तशा गीत-निर्मिती-प्रक्रियेतल्या खुब्या कळू लागल्या... आणि म्हणून ह्या गाण्यापुरता माझा मीच एक अंदाज पक्का केला आणि वडीलाना तो केवळ कन्फर्म करावा म्हणून विचारलं.. ही चाल आधी बांधून मग तुम्ही हे शब्द लिहिले असतील ना ? वडिलांनी मला धक्काच दिला ..ते म्हणाले, छे रे.. मी फक्त ध्वज हा विषय पकडून नुसती पारंपारिक आरती लिहिलीय रे.. म्हणून पहा ना .. मी उडालोच. खरोखरच सुखकर्ता दुखकर्ता ह्या चालीत हे सम्पूर्ण गाण् फिट्ट बसतं. आणि मग मला माणगावकर मास्तरांचं मोठेपण जणू नव्यानं उमगलं. त्यांनी त्या पारंपारिक आरतीचा आकृतीबंध आपल्या अनोख्या स्वराकृतीनं जणू ताजा टवटवीत करून टाकलाय. अभिजात गीत लिहिणारा गीतकार मोठाच.. पण रचनेतली सुप्त लय पकडून, तर कधी कधी मूळची लय पूर्ण बदलूनही संगीतकार काय किमया करतो ह्यांचा तो मला मिळालेला पहिला धडाच म्हणता येईल...
मूळची कविता तुम्हाला ह्या लेखातच वाचायला मिळाली आहे. पण ती प्रत्ययकारी चाल ? तिचा साक्षात प्रत्यय तुम्हाला कसा बरे मिळणार..? आहे, तीही सोय आहे. ह्याच लेखात मी, आधी बीज एकले ह्या बोधचित्रपटाचा उल्लेख केला आहे. त्याचा सगळा शिखरबिदू (आपल्या मराठीत, क्लायमेंक्स) समूहस्वरात ध्वनिमुद्रित केलेल्या ह्या चैतन्यदायी शब्द-स्वरांच्या पार्श्वभूमीवरतीच बांधला आहे. तो अनुभवून पहाच. आता ती डीव्हीडी कुठे मिळणार ?
सगळी उत्तरं बसल्याजागी कशी बरे मिळणार.. शोधा म्हणजे सापडेल. कमीत कमी माझ्यापर्यंत पोचलात तरी काम होऊन जाईल.
मग, कधी निघताय ?
No comments:
Post a Comment