Saturday, 29 October 2011

स्वगत संवाद - १६

सुजाण.. समृद्ध.. प्रयोगशील..

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा सांगोपांग वेध लेखनाद्वारे घेऊ जाणे हा शब्दमाध्यमाची कसोटी पाहणारा प्रयोग ठरेल. पण तरीही कमीत कमी शब्दांत त्यांची ओळख करून द्यायची झाली तर केवळ सहा शब्दही पुरेसे ठरतील. मराठी भावसंगीताची क्षितिजे विस्तारणारे प्रतिभावंत संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.  भारतीय अभिजात शास्त्रीय रागसंगीत, त्याचे ठुमरी, दादरा, कजरी आदी ललित उपप्रकार, एकीकडे बहुजनसमाजाला मोहविणाऱ्या लोककला आणि त्यातून प्रवाहित झालेले लोकसंगीत या दोन्हीतून जन्म घेऊन बहरत गेलेले नाटय़संगीत आणि विज्ञानयुगाचा हात धरून सुरू झालेले चित्रपटसंगीत असा परंपरेचा केव्हढा तरी विस्तृत पट आपल्याला लाभलेला आहे. या पाश्र्वभूमीवर १९३० च्या दशकात आधुनिक मराठी कविता आणि नामवंत कवींचे तत्कालीन लहानथोर रसिकांना  आवडणारे काव्यगायन यांतून एक अभिनव ललित गायनप्रकार सुरू झाला आणि पाहता पाहता त्याने अवघे रसिकविश्व व्यापून टाकले. कानामागून येऊन तिखट झालेला हा मराठी ‘भावगीत’ नावाचा छोटासा झरा आज पाहता पाहता त्रिखंड व्यापून टाकताना दिसतो आहे. पण त्याचेही नवल वाटायला नको. कारण आधी उल्लेखिलेल्या परंपरेच्या मूलतत्त्वांतूनच मराठी भावगीताचे भरणपोषण झाले. आजही ती प्रक्रिया चालू आहे. इतकेच नाही, तर भविष्यातही ती अखंड चालूच राहणार आहे. त्याच्या जोडीला नव्या वैश्विक संगीताचे अनेकानेक प्रवाह आणि त्यांची आपापसात होणारी देवाणघेवाण यातून एक नवीच सांगीतिक परिभाषा आकार घेत जाईल असे एकूण चित्र दिसते आहे. या सर्व प्रवासात मराठी भावसंगीतामध्ये १९६० च्या दशकापासून सुरू झालेल्या एका नव्या आधुनिक भावगीत-युगाला अनन्यसाधारण स्थान आहे. आणि ते महत्त्वाचे वळण देणारी जी मोजकी नावे आहेत, त्यामध्ये सिंहाचा वाटा नि:संशय पं. हृदयनाथ मंगेशकर या नावावर नोंदवला जाईल याविषयी दुमत होण्याचे कारण नाही.
 
हृदयनाथांविषयी बोलताना त्यांना केवळ मराठी भावसंगीतापुरते सीमित करणे असमंजसपणाचे ठरेल. हिंदी आणि मराठी संगीतविश्वाच्या विशाल पटावर त्यांचे काम समजावून घ्यायला हवे. कारण एकतर ते संगीतकार म्हणून १९५० च्या दशकात प्रथम प्रकट झाले ते त्यांच्या दोन अवर्णनीय मधुर हिंदी रचनांनी.. ‘बरसे बुदिया सावनकी, सावनकी मनभावनकी’ आणि ‘निसिदन बरसत नैन हमारे..’ लता मंगेशकरांच्या ऐन भरातील साक्षात्कारी स्वराने भिजलेली ही दोन गाणी ऐकणे हा आजही एक शब्दातीत अनुभव ठरतो. आणि या अजोड स्वररचना वयाची विशीही न गाठलेल्या संगीतकाराने बांधल्या आहेत, या गोष्टीवर विश्वास ठेवणे जड जाऊ लागते. पण दुसऱ्याच क्षणी ती खात्रीही पटते. कारण त्या स्वरांना लगडलेली विलक्षण निर्मळ शुद्धता ही त्या वयाच्या कोवळेपणातूनच येऊ शकते, हेही आपल्या ध्यानात येतं.  या दोन गाण्यांतून व्यक्त झालेली त्यांची स्वरप्रतिभा किती विविध वळणे आणि किती विविध उन्मेष दाखवीत पुढे चालू राहिली आणि आजतागायत चालू आहे! त्यांच्या त्या प्रवासाचा, त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांचा साद्यंत परामर्श हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय ठरेल. पण एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते की, त्यांचा हा सारा प्रदीर्घप्रवास एखाद्या  बोझदार विलंबित ख्यालाच्या अंदाजाने चालला आहे. त्यामध्ये कुठेही असुरक्षित, बुभुक्षित घिसाडघाई दिसत, जाणवत नाही. याचं सर्व श्रेय दैववशात लाभलेल्या सुस्थित परिस्थितीला देऊ पाहणं अन्यायाचं होईल. कारण कलावंत म्हणून असलेल्या  मूलभूत भूमिकेमध्ये रु जलेली ही स्थिरता आणि संयतता ही बाह्य परिस्थितीतून जन्मत नाही. ती मुळामध्ये तुमच्या वृत्तीतच सामावलेली आणि भिनलेली असावी लागते.  एरवी आपल्या घरातच एक जन्मसिद्ध आणि दुसरी प्रयत्नसिद्ध अशा दोन सार्वभौम सम्राज्ञी नांदत असताना एखाद्याने तेव्हढय़ा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा निर्थक, वायफळ प्रयत्न करीत आपले उभे आयुष्य वाया दवडून टाकले असते. पण असे  काही न करता त्या अलौकिक आणि लौकिकभरल्या घरातही हृदयनाथांनी आपली कलासाधना ‘एकला चालो रे’ थाटात संथ लयीत चालू ठेवली. त्या अलौकिक तेजोवलयाचा आदर राखीत त्यांनी आपल्यासमोरचा काळोख स्वत:च्या निरंतर अभ्यासातून आणि अखंड साधनेतून उजळवून टाकला आणि त्यातूनच आपली स्वत:ची प्रकाशवाट रेखीवपणे कोरीत ते इथपर्यंत येऊन पोचले आहेत.
 
खरे पाहता एकीकडे त्यांनी ख्यालिया गायक होणं हे अधिक ओघानं येणारं होतं. एकतर त्यांचा प्रकृतिधर्म त्याला अनुरूप होता. अमीरखांसाहेबांकडे त्यांची शागिर्दीही चालू होती. ‘चाला वाही देस’मध्ये किंवा ‘लेकिन’ चित्रपटात त्यांच्या रियाजी गळ्यातील शक्यतांची आजही चुणूक मिळते. शिवाय नेणतेपणी अस्तित्वात रु जलेले मा. दीनानाथ हळूहळू जाणवू लागले असणार. कदाचित त्यांच्या चिजांच्या वहीतून स्वाध्यायही सुरू झाला असेल. पण याचवेळी एकीकडे ते कुमारवयात असताना  हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ चालू होता. तेव्हाच्या एकाहून एक तेजाळ सांगीतिक प्रतिभा त्यांना जवळून निरखायला आणि पारखायलाही मिळत होत्या.  आणि त्या सर्वाचं सार्थक करणारा केंद्रबिंदू असा लता नामक अद्भुत स्वर त्यांच्या थेट समोर अगिणत उन्मेष दाखवीत फुलत, बहरत होता. शिवाय या सर्वाच्या जोडीला साहित्याचं डोळस वेड जडलं होतं. विशेषत: कवितेशी जवळीक होत चालली होती. त्यातील प्रायोगिक नावीन्याची मनाला ओढ होती. आणि त्याचवेळी जुन्या-नव्या संत-पंत-तंत कवींची कविता मनात रूंजी घालत होती. यातून आकाशवाणीशी संबंध येऊ लागला. राजा बढेंसारख्या ज्येष्ठ राजस कवींनी प्रेरणा दिली. त्यांच्यातील सुप्त संगीतकार जागा होऊ लागला. आणि तिथून ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ असा हा प्रवास सुरू झाला. ‘अभ्यासोनी प्रगटावे’ हे समर्थ-वचन आपल्या जगण्यातून साकार करीत जगलेल्या व्यक्तीमालिकेत हृदयनाथांचा समावेश ठळक अक्षरात अग्रभागी होईल.
कुणाचेही श्रेय सहजासहजी मान्य करणे हा मराठी स्वभाव नाही. हा दोष म्हणावा की चोखंदळपणा, हीदेखील तशी सापेक्ष गोष्ट आहे.
 
पण एक खरे, की हृदयनाथांनी जसा त्यांचा प्रवास ख्यालाच्या संथ, ठाय लयीत केला तसाच त्याचा स्वीकारही आपण मराठी जनतेने तसाच, किंबहुना जरा अधिकच विलंबित लयीत केला. पण कधीही आणि कुठेही त्या- त्या काळातील प्रस्थापित प्रवाहांवेगळी दिशा शोधू पाहणाराला कसोटी घेणाऱ्या दिव्यातून जावेच लागते. आणि मंगेशकर या आडनावाला ही गोष्ट मुळीच अनोळखी नव्हती. अगदी बाप-लेक म्हटले तरी त्यांच्यात तुलना अयोग्यच; पण तरीही मा. दीनानाथांनी त्यांच्या काळात केलेला प्रवाहाविरु द्ध स्वयंभू शोधप्रवास आणि आजवरची हृदयनाथांची वाटचाल या दोन्हीमध्ये कुणाही अभ्यासकाला बिंब-प्रतिबिंबाचा प्रत्यय आला तर त्यात नवल ते काय? पण कदाचित त्यामुळेच,  स्वरप्रतिभा आणि स्वरभूमिका या केवळ दोन निकषांवरही हृदयनाथ मंगेशकर सर्वार्थाने आपल्या तीर्थरूपांचे निखालस वारस ठरतात, हे मात्र खरे.
 
अशा अभिजात प्रतिभावान व्यक्तीसाठी वय हे केवळ त्यांच्या सत्कारासाठी असलेले  एक तात्कालिक निमित्त असते. एरवी निवृत्ती त्यांच्या संदर्भात संभवत नाही. तिथे ‘निवृत्ती’ या शब्दाला एकच पर्याय असतो :  नव-वृत्ती! 
 
हृदयनाथांची ही नव-वृत्ती अधिकाधिक डोळस आणि तजेलदार होत राहो, ही शुभेच्छा.

* * * * * * *
लोकसत्ता, दिनांक २६ ऑक्टोबर, पं हृदयनाथ मंगेशकर विशेष पुरवणीसाठी अतिथी संपादक म्हणून लिहिलेला लेख

No comments:

Post a Comment