परवा अचानक आशय फिल्म क्लबच्या सतीश जकातदारचा फोन आला. आज संध्याकाळी अर्काईव्ह थिएटरमध्ये दास नावाच्या बाईनी केलेल्या चार डॉक्युमेंटरी दाखवतोय. जरा दुर्मिळ आहेत..पहायला येच. साहजिकच संध्याकाळी हजर झालो. प्रख्यात नर्तक-रचनाकार उदयशंकर, भारतीय रागसंगीतगायनाची पायाभरणी करणारे श्री. कृष्णराव पंडित आणि त्या घराण्याचा इतिहास ह्यांची ओळख, आपल्या गायन-निवेदनातून जिवंत करणारी त्यांची नात मीता पंडित, सरोदवादक अमजद आली आणि विश्वविख्यात रविशंकर असे चार विषय ह्या दासबाईनी हाताळले आहेत. त्यांची स्वत:ची अशी एक स्वतंत्र शैली जाणवली... प्रवाही संकलन हे त्यांचं प्रमुख बलस्थान वाटलं.. अर्थात बोधपट निर्मितीत ते तसं असणं अपरिहार्यच असतं.
मला स्वत:ला पहिल्या दोन फिल्म्स अधिक वेधक वाटल्या. (हया विधानात लपलेलं दुसरं विधान म्हणजे, पुढच्या दोन्ही फिल्म्स तुलनेत अधिक निष्प्रभ वाटल्या, हे नाकारण्यात अर्थ नाही) आवडलेल्या दोन फिल्म्समध्ये पहिल्या क्रमांकावर मिता पंडीत आणि पाठोपाठ उदय शंकर असा अनुक्रम मी माझ्यापुरता लावेन त्यामध्ये उदय शंकर हा विषय मला अनेक वर्षांपासून अनेक अर्थानं कुतूहलाचा होता. लहानपणापासून एका वेगळ्याच वलयातून जाणवलेला आणि तरीही तसा दूरस्थच राहिलेला हा विषय असा साक्षात पहायला अनुभवायला मिळणं ही तशी अपूर्वाईच म्हणावी लागेल. खरं तर उदय शंकर ह्याचं एखादं मनावर ठसावं असं छायाचित्रही पहाण्याचा योग आजवरच्या इतक्या दीर्घ आयुष्यात आला नव्हता. अर्थात मुद्दाम तसा शोध घेण्याचा प्रयत्नही झाला नव्हता हे अधिक खरं. पण आज ती सगळी कसर भरून निघाली. छायाचित्रातून, चित्रणातून, जवळून दुरून उदय शंकर अखंड दिसत राहिले त्यांच्या प्रतिमा ह्या चित्रपटातील अनेक दृश्यं पहायला मिळाली... आणि आजवरच्या उणीवेची पुरेपूर भरपाई झाली.
उदय शंकर ह्यांच्या पत्नी अमला शंकर ह्यांनी त्याच लघुपटात बोलताना उदय शंकर ह्याच्या समग्र अस्तीत्वाबद्दल Divine Existance असा शब्दप्रयोग केला.. तो अत्यंत समर्पक होता.. अशा काही दैवी कल्पनांचा वापर जाता येतां कुणी केला तर लगेच प्रभावित व्हावं हा माझा मूळचा स्वभाव नाही आणि आता ती स्टेजही नाही. पण Black and white मधील उदय शंकर ह्यांचं ते चल आणि अचल दर्शन घडत असताना आपण सजीव मानव-स्वरूपात वावरणारा एखादा यक्ष पहातो आहोत असं खरोखरच भासत होतं.. पती-पत्नी हे दोघेही कलाकार असले तरी आयुष्यभर एकत्र सहजीवन हा बोलायला कितीही रोमांचक विषय वाटला तरी प्रत्यक्षात अतिपरिचयात अवज्ञा हे एक अटळ वास्तव उरतंच. त्या दिव्यातून पार पडल्यावरही ही Divine Existance ची प्रतिमा तितकीच उत्कट रहाणे ही नक्कीच मौल्यवान गोष्ट मानावी लागेल. फिल्ममध्ये एकूणात मुलाखती तशा निवडकच होत्या. त्यामध्ये उदय शंकर ह्यांची कलाकार कन्या ममता शंकर ह्यांचंही मनोगत येणं ओघानंच आलं. त्यांना आजच्या प्रौढ पुरंध्रीरूपांत पहाताना मला मात्र सर्वकाळ मृणाल सेन ह्यांच्या मृगयामधली कोवळी कृश षोडशी दिसत होती. आदिवासी स्त्री रूपातली; आपल्या प्रियकर पतीच्या धनुर्विद्याकौशल्याची प्रचीती गो-या आहेबाला देण्यासाठी धावपळ करणारी.. हे सगळं चालू असताना खरं तर अपेक्षितच असलेली पण तरीही त्या क्षणी मला अनपेक्षित भासलेली एक गोष्ट घडली. उदय शंकर ह्यांच्या स्नुषा तनुश्री शंकर ह्यांची मुलाखत सुरू झाली.. त्या साहजिकच त्यांचे संगीतकार पती आनंद शंकर ह्यांच्या विषयी बोलत होत्या. त्या एका क्षणात इतका वेळ दूरस्थपणे समोर उलगडणारी ती फिल्म एकाएकी माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी एका आंतरिक जिव्हाळ्याने जोडली गेली. कारण सुमारे एका तपापूर्वी आनंद शंकर आणि तनुश्री ह्या कलाकार दाम्पत्याला मी जवळून भेटलो होतो.. इतकंच नाही तर एका रंगमंचीय आविष्कारात त्या दोघाना मी माझा साक्षात सहभागही दिला होता..
मला वाटतं, ते १९९७ साल होतं. एका पटकथालेखन निमित्ताने मी ठाण्यात मुक्काम ठेवून होतो. दिग्दर्शक रघुवीर कुलही माझ्याबरोबर होते. तिथे अचानक तेव्हाचे सांस्कृतिक सचिव (चूकभूल देणे घेणे) गोविंद स्वरूप ह्यांचा फोन आला.. ते वर्षं मराठी चित्रपटाच्या पन्नाशीचं होतं. त्यानिमित्ताने त्या वर्षीचा महाराष्ट्र चित्रपट पारितोषिक सोहळा विशेष रंगतदार स्वरूपात आखला जात होता.. तेव्हां ह्या चित्रपट वाटचालीचा परामर्श घेणारं एखादं काव्य मी लिहावं., संगीतकार आनंद शंकर ते स्वरबद्ध करतील आणि तनुश्री शंकर त्यावर नृत्य-विरचनां सादर करतील, अशी ती कल्पनां होती. कल्पना निश्चितच वेधक होती.. पण हुरळून धावत सुटावं अशातली तो गोष्ट माझ्या दृष्टीनं नव्हती.. मी कविता लिहून पाठवतो, पुढे तुम्ही जे काय करायचं ते करां. मला म्युझिक सिटींगसाठी वेगळा वेळ देता येणार नाही हे मी प्रांजळपणे कळवून टाकलं आणि पाठोपाठ माझी कविताही गोविंद स्वरूप ह्यांच्याकडे पाठवून दिली ..ह्याचा अर्थ श्री. आनंद शंकर ह्यांच्याविषयी माझ्या मनांत आदर, आत्मीयता नव्हती असा मुळीच नाही. पण तेव्हांची मनाची व्यग्रता वेगळी होती इतकंच...कविता मात्र माझ्या मनाजोगती झाली होती. ह्या निमित्ताने जे व्यक्त करावं असं वाटत होतं ते छान व्यक्त झालं हे समाधान मला पुरेसं होतं. दोन दिवसांनी गोविंदजींचा फोन आला.. ते म्हणाले, कविता आनंद शंकरनां दिली आहे ..पण ते तुम्हाला एकदा व्यक्तिश: भेटू इच्छितात. ह्यापूर्वीच्या, व्यवसायातील पुर्वानुभवामुळे मला एकूण ह्या प्रकाराचा जरा कंटाळाच आला होता...मुख्य म्हणजे कवी आणि कलाकार म्हणून माझे प्राधान्यक्रम बदलले होते.. जरा द्विधा मन:स्थितीतच आनंद शंकरनां फोन केला.. फोनवरचं त्यांचं बोलणं खूप मन:पूर्वक होतं.. आपका ज्यादा समय मै नही जाया करूंगा ..थोडा मिलेंगे ..बाते करेंगे तो मुझे सहायता मिलेगी..
एका सकाळी जुहू लोखंडवाला परिसरात त्यांच्या निवासस्थानी गेलो. ते नुकतेच मुंबईला स्थलांतरित झाले होते.. तनुश्री एका नव्या नृत्यप्रयोगाच्या तयारीसाठी अजून कलकत्यातच होत्या. आनंद शंकर सविस्तर भेटले. मध्यंम उंची, सुखवस्तू शरीरयष्टी, गौर वर्ण, स्नेहशील प्रसन्न हास्य, सौम्य मुद्रा.. माणूस प्रथम भेटीत आवडला.. पण खरा चकीत झालो ते त्यांच्या पुढच्या बोलण्यामुळे .. माझी भेट हवी असण्यामागचे प्रयोजन ते सांगत होते.. बोलणं हिंदी आणि इंग्रजीची सरमिसळ असलेलं ..
त्याचा मितीतार्थ थोडक्यात असा होता...
सुधीरजी, ही म्युझिक आणि कोरिओग्राफीची ऑफर आली तेव्हां मला वाटत होतं ..टिपिकल फिल्मी समारंभ, त्यांत एखादं लोकगीत कोळी-नृत्य टाईप रूटीन काम असणार.. पण दोनतीन दिवसापूर्वी एका खाजगी फिल्मी पार्टीत गेलो होतो. दिलीपकुमारसारखी बुजुर्ग मंडळी होती.. त्या पार्टीत गोविंद स्वरूपजी भेटले ..त्यांनी हा कागद मला दिला. एका कोप-यात काही मिनिटात त्याचा एक जनरल कंटेंट मला थोडक्यात सांगितला.. पण तो ऐकताना मी सावध झालो.. मला एवढं लक्ष्यात आलं की ये तो सरासर पोएट्री है.. और बहोत तगडी पोएट्री है.. इसका म्युझिक करना और उपरसे उसको कोरिओग्राफ करना कोई बच्चोंका खेल नही ..ये बडी content वाली बात लगती है. तो कुछ भी सोचने से पहिले मुझे खुद पोएटकें साथ बोलना चाहिये ..खुद उनसे ये उनकी कहन पुरी समझ लेनी चाहिये, और इसलिये आपको ये तकलीफ दे रहा हू.. अब आप प्लीज खुदही ये आपकी कविता मुझे पुरी तरहसे समझा दिजीये.. मला हा एप्रोच खरोखरच अनपेक्षित होता. सामान्यत: अशा प्रसंगातली नेहमीची ओळखीची वाक्य अशी असतात.. हां ..कविता बघितली.. पण काय बरं कां माझ्याकडे एक चाल बांधलेली तयार आहे. एकदम मस्त ठेक्याची.. त्यावर नाच आहे नां .. ..तर आपलं त्याच्यावरच काहीतरी तुमचं जे काय असेल ते .. काय ?
आणि मग खरोखरच आनंद शंकरजी ती कविता अथपासून इति पर्यंत छान समजावून घेतली. प्रत्येक शब्दांच्या अर्थाच्या छटा रस घेउन समजावून घेतल्या. कवि म्हणून माझी एक नेहमीची संवय आहे ..खरं तर ती एक भूमिकाच आहे. त्या त्या ठिकाणची गरज नीट समजावून घ्यायची.. ती तर पूर्ण व्हायला हवीच .. पण तेव्हढ्यापुरतंचं लिहायचं नाही. .त्या घटनेमागील आणि गरजेमागीलही सगळा अवकाश ध्यानी घ्यायचा. ..आणि मग त्यातून उठलेले मनाचे तरंग शब्दातून वाहते करायचे. तेच इथंही केलं होतं.
स्वातंत्र्याच्या पंचपदीची बहरून येईल वेल
छाया आणिक प्रकाश ह्यांचा
असा रंगू दे खेळ ..
ह्या पहिल्या ध्रुवपदावरचं आधी ते खूष झाले. म्हणाले, सुधीरजी, वैसे ये होनेवाली इव्हेंट तो सिर्फ फिल्म मिडीयम की है.. लेकिन आपने जॉ बात लिखी है वो सिर्फ एकही मीडीयमकी नाही.. जॉ आज है और जॉ भविष्य में आनेवाले है उन सब ऑडियो व्हीज्यूअल फॉर्मकी बातका जिक्र इसमे है .... मै तो कहूगां, नाटक, नृत्य, लिटरेचर, पेंटिंग इन सभीकें साथ ये शब्द जुड जाते है.. क्यो की छाया और प्रकाश ये दो बाते तो सभीमे है.. छाया आणिक प्रकाश ह्यांचा असा रंगू दे खेळ...क्या बात है.. खरं तर आनंद शंकर ह्यांच्या हाती जाण्यापूर्वी ही कविता कितीतरी व्यक्तींच्या हातातून गेली होती. पण तिचा असा सम्यक आस्वाद घेण्याची कृती कुणाकडून घडली असेल कां ? शंकाच आहे. आणि तरी ती सर्व मराठी मंडळी होती.. ह्याउलट त्या काव्य सौंदर्याने मोहरलेला हां माणूस पूर्णपणे अमराठी होता..
कविता अशी समजून घेणं हां एक काव्यरसिक असण्याचा भाग झाला.पण त्या कवितेच्या प्रत्यक्ष सादरीकरणाचा विचारही आनंद शंकरजीनी त्यांच बैठकीत नक्की करून टाकला. ते म्हणाले कवितेचा हां गंभीर खोल आशय हां समूहनृत्यातून व्यक्त होणं कठीण ..तेव्हां सम्पूर्ण कविता संगीतबद्ध न करता त्यातील नृत्याला अनुकूल असे केवळ तीन अंतरे त्यांनी निवडले आणि ते रेकॉर्ड करून कोरिओग्राफीसाठी द्यायचं ठरवलं. आणि पुढे त्यांनी सुचवलं की हां पुढचा सादरीकरणाचा भाग मंचावर येण्याआधी एक वाद्यमेळ केवळ पार्श्वभूमी म्हणून रेकॉर्ड करतो.. त्यावर तुम्ही स्वत: मंचावर येउन ही सम्पूर्ण कविता सादर करा आणि त्यातूनच पुढची तनुश्रीनी बसवलेली कोरिओग्राफी सादर होईल.. खरं म्हणजे हया आधीपासूनच कविता पानोपानी ह्या माझ्या प्रयोगात मी ध्वनिमुद्रित संगीतावर कवितेचं लयदार सादरीकरण करीत होतोच. पण त्याची काहीही माहिती नसताना त्यांची संकल्पनां त्याच अंगानं जाताना पाहून मला मौज वाटली.. ह्या आधी प्रामुख्याने फ्युजनकार म्हणून मी आनंद शंकरना ओळखत होतो. पण त्याक्षणी मला जाणवलं की आपण फक्त एका संगीतकार व्यक्तीला भेटत नाही आहोत.. सर्व कला माध्यमांची डोळस जाण असलेल्या एका संवेदनाशील कलाकार व्यक्तीला भेटतो आहोत. जी व्यक्ती साक्षात उदय शंकर ह्या प्रतिभावंताची खरीखुरी थेट वारस आहे. नंतर अर्थात त्या सोहळ्यात योजल्याप्रमाणे ती कविता थाटामाटात सादर झाली. निरोप घेताना माझे दोन्ही हात आपल्या हातात धरून आनंद शंकर मला म्हणाले.. सुधीरजी, मिलते रहेंगे .. साथ काम करेंगे ..
काळाच्या योजना वेगळ्याच असतात. ह्या नंतर अल्पावधीत अचानक हृदयक्रिया बंद पडून आनंद शंकर हे जग सोडून गेले.. तनुश्रीही पुन्हा कलकत्याला परत गेल्या असणार.. कितीतरी वर्षांनी त्याना काहीशा प्रौढ रूपांत पडद्यावर पहाताना माझ्या मनांत ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्या एका क्षणार्धात, पडद्यावरचं ते नाद लयीचं यक्ष-जीवन माझ्यासाठी दूरस्थ राहिलं नाही.
प्रिय सुधीरजी,
ReplyDeleteमी तुम्हाला दाद देणे हा आगाऊपणा होईल.
पण तुमचं असं प्रामाणिक आणि सहज लेखन माझ्यासारख्यांना सुखावत राहील यात शंका नाही.
प्रिय सुधीर काका , वाचून खूप छान वाटलं.
ReplyDelete