परवाच्या ३१ जुलै २०११ च्या रविवारी माझी नवी काव्यमैफिल कविता-सखी मी प्रकाशात आणली. सर्वच योग चांगले, म्हणजे माझ्या मनासारखे जुळून आले होते. तसे ते बहुतेकवेळी जुळतातच. कारण तसे ते जुळून येईपर्यंत कितीही वाट पहाण्याची माझी तयारी असते.. ह्यामध्ये केवळ ती एक न संपणारी प्रतीक्षा ठरण्याचा धोका नक्कीच असतो. पण तो मला परवडतो घाईघाईनं काहीतरी झालं एकदाचं हया प्रकारच्या समाधानापेक्षा ती गोष्ट अजिबात न होणं हे सुद्द्धा एकवेळ मला परवडतं.. इतकी टोकाची भूमिका असल्यामुळे असेल कदाचित पण तशी चुकामूक आजवरच्या आयुष्यात जवळ जवळ मी अनुभवली नाहीच, असं म्हणता येईल. अर्थात आजवर ती अनुभवली नाही म्हणून भविष्यात ती नसेलच असं मुळीच नाही. पण तरीही त्या धास्तीनं माझा मूळचा मनोधर्म बदलेल अशी शक्यता दिसत नाही.. उलट तो मनोधर्म अधिक बळकट व्हावा असेच अनुभव मला पुन्हा पुन्हा येत राहतात.. उदा. हा काव्यप्रयोग, कविता सखी..
पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्रयोग करण्यासाठी मिळालेली भूमी.. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दीनायन कलापर्व हया उपक्रमात हा प्रयोग थाटामाटात साजरा झाला. स्थळ होतं, हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील सौद वाहवान नामे सभागृह. तिथं खरं तर बरेच वेळा जाणं झालं. पण त्याचं नांव हे असं काही तरी आहे हा शोध मला हया निमित्ताने प्रथमच लागला. आणि इतकं अवघड नांव ध्यानांत ठेवण्याचा खटाटोप करण्यापेक्षा आपण आपलं त्याला बभ्रुवाहन सभागृह असं ओळखीचं सुटसुटीत नामकरण (निदान आपल्यापुरतं) करावं काय ? असा एक चोर-र्विचार अथवा पोरविचार मनाला चाटून गेला..
कविता सखीचा शुभारंभाचा प्रयोग करायला इतकी नेमकी आणि समर्पक जागा मला एरवी शोधूनही मिळाली नसती. हया प्रयोगाचा विचार नाही म्हटलं तरी गेली दोन तीन वर्षं मनांत घोळत होता. प्रयोगाच्या स्वरूप-आखणी इतकाच त्या प्रयोगासाठी मिळणारा रंगमंच माझ्या दृष्टीनं महत्वाचा होता. रूढ रंग- मंचापेक्षा जरा वेगळा, नेहमीच्या कलाविश्वातील हमरस्त्यावर न भेटणारा, काहीतरी एक अभिजात अधिष्ठान असलेला असा नॉन कमर्शियल प्रायोगिक मंच माझं अंतर्मन माझ्याही नकळत शोधत होतं.. एका शुभं क्षणी मित्र अरुण काकतकर अगदी सहज म्हणाला, आमच्याकडे दीनायन कलापर्वात करतोस कां ?.. त्या शब्दांनी मला जणू युरेकावस्था प्राप्त झाली.. त्यातून भानावर येताच मी तत्काळ होकार भरला आणि मनातल्या अमूर्त संकल्पनेला आकार देण्याच्या मानसिक प्रक्रियेला प्रकट सुरुवात केली.
कविता सखीची पार्श्वभूमी खरं तर, वर सांगितली इतकी छोटी आहे.. पण तिचं खरं मूळ शोधायचं असेल तर आजमितीपर्यंत उलटलेल्या आयुष्याची पटलं बाजूला सारीत शोध घ्यावा लागेल.. कवितेचा हा सूक्ष्म नाजूक पण विलक्षण चिवट तंतू पकडून मागे मागे, खूप मागे जावे लागेल..
एवढंच ना.. मग जाउ यां की ..
मस्त कार्यक्रम आहे 'कविता-सखी'! तिचं मूळ जाणून घ्यायला नक्कीच आवडेल...
ReplyDelete