मी, एक कवी, आपलं सगळ लेखन संगणक वापरून करतो ही गोष्ट आजही बहुतेकांना पचत नाही. मुळामध्ये आपली कलानिर्मितीची कल्पना फारच नाजूक, तरल, हळवी वगैरे असते. जमिनीवरचे पाय पूर्ण सोडून, आकाशात कुठतरी दूरवर नजर विरघळवून मगच कविता वगैरे जन्माला येतात अशी ह्या मंडळीची पुरेपूर खात्रीच असते. मन बोलू लागणे ही खरं तर लेखनामागची मूलभूत प्रेरणा म्हणता येईल. त्यानंतर होणारं प्रत्यक्ष लेखन ही केवळ शारीरिक क्रिया मानायला हवी. . मग ते लेखन भूर्जपत्रावर कमलदलान होवो, कागदावर बोरूने होवो, पेन्सिल,फौटन्पेन किंवा बॉलपेनने होवो किंवा आत्ता मी करतो आहे तसं संगणकावर होवो.. आजमितीला विशेषत: ईमेलमुळे त्यासाठी अपरिहार्य असलेल्या टायपिगच्या माध्यमातून बहुसंख्य सर्वसामान्य आणि लेखक कलावत हे देखील संगणकाकडे वाढत्या प्रमाणात वळलेले दिसताहेत. पण सुमारे १९९८ मध्ये म्हणजे तब्बल एक तपापूर्वी मी लेखनासाठी संगणक हे माध्यमं निवडलं तेव्हा परिस्थिती खूपच वेगळी होती. अशा त्या पार्श्वभूमीवर मला इकडे वळाव असं का वाटलं ही थोडी गमतीशीर प्रक्रिया आहे.
कुठल्याही नव्या संपर्क-माध्यमाकडे, मोबाईल, संगणक, इटरनेट इत्यादी. आरंभी बराच काळ संशयानं, शक्यतो तुच्छतेनं पहाण हा भारतीय, त्यातही खास करून मराठी बाणा अस्मादिकांमधेही होताच. पण एकेदिवशी एका छोट्याशा घटनेमुळे, खरं तर एका सहज उदगारामुळ मी भानावर आलो.
मुंबईमध्ये एका मित्राच्या ऑफिसात गप्पा छाटीत बसलो होतो. बोलायच्या ओघात मित्राची कॉलेजच्या वयातली पुतणी एकदम म्हणाली.. ‘काका, तू जर कॉम्प्यूटर शिकला नाहीस ना, तर तू थोड्याच दिवसात निरक्षर ठरशील.’ ते वाक्य सगळयानी हसण्यावारी नेलं .. पण मला मात्र आतून चाबूक बसावा तसे झालं त्या क्षणापासून माझ्या मस्तकात हे नवीन संगणक-कुतुहलचक्र फिरू लागलं जे मला इथपर्यंत घेउन आलं असं म्हणता येईल पण ह्याच्या जोडीला आणखीही एक फोर्स कार्यरत झाला होता, जो अधिक महत्वाचा मानायला हवा.
मुंबईमध्ये एका मित्राच्या ऑफिसात गप्पा छाटीत बसलो होतो. बोलायच्या ओघात मित्राची कॉलेजच्या वयातली पुतणी एकदम म्हणाली.. ‘काका, तू जर कॉम्प्यूटर शिकला नाहीस ना, तर तू थोड्याच दिवसात निरक्षर ठरशील.’ ते वाक्य सगळयानी हसण्यावारी नेलं .. पण मला मात्र आतून चाबूक बसावा तसे झालं त्या क्षणापासून माझ्या मस्तकात हे नवीन संगणक-कुतुहलचक्र फिरू लागलं जे मला इथपर्यंत घेउन आलं असं म्हणता येईल पण ह्याच्या जोडीला आणखीही एक फोर्स कार्यरत झाला होता, जो अधिक महत्वाचा मानायला हवा.
अगदी लहानपणापासून मला हाताने लिहिणे ह्या क्रियेचा अनाकलनीय कंटाळा होता. शिक्षणात परीक्षांमध्ये माझी जी भंबेरी उडायची त्यामध्ये ह्या लेखन-निरुत्साहाचाही वाटा मोठा मानायला हवा. खरं तर घरांतील संस्कारांमुळे हस्ताक्षर, शुद्धलेखन हया गोष्टी मुळातच अनुकूल होत्या. पण तरीही हाताची बोटं, लिहू लागलं की असहकार पुकारायची . मी कवी झालो ह्यामागेही कमी लिहावे लागणे ही सोय अधिक महत्वाची ठरली असणार.. कारण तिथंही कविता सुचताना झपाझप खरडली जायची. पण तिचीनीटनेटकी सुवाच्य प्रत करताना माझा जीव आजही मेटाकुटीला येतो.. जन्मजात स्मरणशक्तीचा लाभ भरपूर प्रमाणात झालेला असल्यामुळे सुचलेली कविता मेंदूवर कोरली जाते आणि कविता ख्र्रडलेला तो कागदाचा कपटा कुठ्ल्याकुठे उडून गेला ते कळतही नाही. माझे एव्हाना सहा कविता-संग्रह् प्रकाशित झाले आहेत. पण त्या श्रेयातील सिंहाचा वांटा, माझ्या स्मरणशक्ती नामक हार्ड डिस्कवरील निराकार कविता कागदावर उतरवून घेणा-या व्यक्तींना द्यावा लागेल. अशा ह्या एकूण अवस्थेत माझी लेखन ओढ आणि हा लेखन कंटाळा ही युती कशी जमवावी हया पेचात माझं बरच आयुष्य उडून गेलं.. कवितेइतकीच, काकणभर अधिकच असलेली माझी गद्य लेखनाची ओढ त्यामुळे, ऐंशीच्या दशकांत प्रकाशित झालेल्या निरंकुशाची रोजनिशी ह्या एकमेव पुस्तकानंतर बराच काळ घुसमटत राहिली होती. मागील तीनचार वर्षांत, अनुबंध, गाणारी वाट प्रकाशात आली. आणि इतर पुस्तकंही झपाट्यानं लिहिली जाताहेत हे श्रेय सर्वस्वी ह्या संगणक माध्यमाला द्यावं लागेल.
एक गंमतीची गोष्ट सांगायला हवी. त्या माझ्या लेखन दुर्भिक्ष्याच्या काळांत मी एक दिवास्वप्न जागेपणीही पहायचो. तेव्हां ती केवळ कवी-कल्पना होती.. माझ्या हस्ताक्षर एलर्जीवर उपाय म्हणून मी चक्क परदेशी लेखकांप्रमाणे छोट्या टंकलेखन यंत्रावर माझं लेखन रूबाबात टम्कित करतो आहे.
(सुसज्ज स्टडी. टेबलावर कॉफी मग, तोंडात पाईप, खरं तर चिरूटच ) पण तेव्हढ्यात एक अणकुचीदार वास्तव त्या स्वप्नाला छिद्र पाडून जायचं . प्रवाही इंग्रजी भाषेचं ठीक आहे हो, पण अगणित –हस्व आणि दीर्घ कानामात्रा,वेलांट्यानी गजबजलेली आपली देवनागरी लिपी आणि तिच्याहूनही क्लिष्ट आणि अवजड असं आपलं ते तत्कालीन मराठी टंक यंत्र (हां शब्द शोधणा-या महाभागास लक्ष दंडवत ) .. पण कवी कल्पना अशी सहजा सहजी हार थोडीच मानते ? मग माझं ते दिवा-स्वप्न कल्पना शक्तीची आणखी एक छलांग मारायचं .मी चक्क इंग्रजी टंक यंत्र वापरतो आहे आणि पुढे कागदावर मराठी उमटते आहे..
कवी अशक्य कोटीतील स्वप्नं पहातात आणि वैज्ञानिक ती सत्यात उतरवतात असं जे वचन आहे ते एक लक्ष एक टक्के खरं आहे. कारण माझं ते अनेक वर्षांचं दिवास्वप्न आज साक्षात साकार झालं आहे. शिवाजी, श्रीलिपी, बराहा, युनिकोड ..ही सर्व मंडळी समस्त म-हाठी लेखकूच्या प्रतिभेचे कोड पुरवण्यासाठी सदैव सिद्ध आहेत. आणि कवीवचन सर्वार्थानं सिद्ध होतं आहे.
शब्दांचे वेष अनेक .. शब्दांचे देश अनेक
शब्दांच्या कवचाआड .. शब्दांचे स्पंदन एक
छान चालू आहे संवाद :-)
ReplyDelete