स्वत: कवी व्हायला मी ब-यापैकी उशीर केला असला तरी कवितेवरचं माझं प्रेम मात्र अगदी बालपणापासूनचं. शीघ्र-स्मरणाचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्यामुळं कितीतरी जुन्या नव्या कविता, आणि कवी मला तोंडपाठ होते.. डोक्यातही एकीकडे कवितेचं गुंजन अखंड चालू असायचं ..कविता वाचायला आवडायची तशीच ऐकायलाही आवडायची .त्यामुळं कवीच्या काव्यवाचनाचा किंवा काव्य-‘गायनाचा (त्याकाळी ह्याचं प्राबल्य जरा अधिक होतं) आस्वाद घेण्याची कुठलीही संधी मी चुकवीत नव्हतो. त्याचा आनंद मिळत होताच. पण तो शंभर टक्के निर्भेळ नसायचा. अर्थात ह्यालाही एक कारण होतं.
कवितेइतकीच रंगभूमी आणि संगीत ही क्षेत्रं प्रथमपासून आवडीची होती. त्यात सुदैवानं चांगली गतीही होती. त्यामुळं आस्वाद आणि सादरीकरण ह्या दोन्ही अंगांनी त्यांचाही आनंद खूप लुटत होतो. त्यातून साहजिकच अभिजात performance हया गोष्टीची जाणीव आणि त्यातले निकष ह्यांचीही मनांत एक बैठक तयार होत गेली..
ह्या पार्श्वभूमीवर, काही सन्मान्य अपवाद वगळता, मला बहुतेक कवींच्या सादरीकरणात उणेपण जाणवायचं .. कधी त्यांच्यात अभिजात परफॉर्मन्सचा अभाव असायचा तर बहुतेक कवींच्या काव्य-गायनात संगीताच्या अंगानं असलेलं उणेपण खटकत रहायचं. ह्याउलट काही चांगले अभिनयकुशल कलाकार आणि गायक अनेक कवींच्या कविता फार सुंदर सादर करायचे. पण तो आनंद लुटताना, त्या सादरीकरणात स्वत: कवी धूसर राहून हे कलाकारच ठसठशीतपणे समोर येताहेत ही वस्तुस्थिती अस्वस्थ करायची.
थोडक्यात, चांगला सादरकर्ता, चांगला गायक आणि चांगला कवी ह्याचा साक्षात्कार एकाच व्यक्तिमत्वातून घडावा अशी एक वेगळीच तहान मनाला व्यापत चालली होती पण पुढे आधी रंगभूमी, नंतर भाव-गायन आणि नंतर सर्वार्थानं शंभर टक्के कवी अशी स्वत:चीच वाटचाल झाल्यावर, ती माझी तहान आपल्या परीनं आपण तृप्त करू शकतो कां ह्याकॅं शोध घेणे ही गोष्ट जणू ओघानं आपसूकच उलगडत गेली ..
१९७१ मध्ये आपली आवड मध्ये सूत्र-निवेदन म्हणून कविता सादर करणं, १९७५ मध्ये कविता कविता कविता आणि १९८७ मध्ये कविता पानोपानी हे काव्य-प्रयोग साकार करणं आणि दीर्घकाळ चालवणं हा सगळा प्रवास ही आजवरच्या आत्म-चिंतनाची आणि आत्म-प्रकटीकरणाची परिणती ठरते.. आणि त्यातूनच आला आजचा हा, अभिजात शास्त्रीय गायनाच्या उपज-अंगानं जाउ पहाणारा माझा नवा लवचिक काव्य-प्रयोग,, .. कविता-सखी
तेव्हां हा नवा प्रयोग उभा करायला किती अवधी लागला ह्या प्रश्नाचं ताबडतोब येणारं एक उत्तर, केवळ आठ पंधरा दिवस असं असलं तरी त्याचं दुसरं खरं उत्तर आजवर कलाकार आणि माणूस म्हणून जगलेलं समग्र आयुष्य हे आणि हेच असेल.
"चांगला सादरकर्ता, चांगला गायक आणि चांगला कवी ह्याचा साक्षात्कार एकाच व्यक्तिमत्वातून घडावा..."
ReplyDeleteदुग्धशर्करा, मणिकांचन वगैरे योग यालाच म्हणतात ना? :-)