आपण लिहिलेल्या अग्रलेख-संग्रहाला माझी प्रस्तावना घ्यावी असं मुळात वसंत आपटे ह्यांच्या मनांत यावं हया घटनेतील आश्च्यर्यातून खरं तर मी स्वत:चं अजून पुरता बाहेर आलेला नाही. कारण गेली तीस-पस्तीस वर्षं मी ज्या भूमिकातून आणि क्षेत्रातून वावरलो आहे, त्या कशाचाही पत्रकारितेशी दूरांन्वयानंही कुणी संबंध जोडू शकेल असं वाटत नाही. आतून बाहेरून लख्ख कलावंत आणि एरवी हाडांमासाचा पुरेपूर स्खलनशील माणूस एवढीच माझी सर्वज्ञात ओळख असणार... आणि तशी ती असण्याला माझीही कसलीच हरकत असण्याचं कारण नाही...मागे एका स्त्री-वादी दिवाळी अंकात माझी एक बरीच प्रदीर्घ मुलाखत, कलावंत म्हणून नव्हे तर एक निखळ व्यक्ती म्हणून, घेतली गेली होती... कला-क्षेत्र पूर्ण वगळून समग्र जीवन संदर्भात प्रश्नाची सरबत्ती झडत होती आणि मीही प्रथमच माझे सुप्त विचार माझ्याही नकळत प्रकट करीत होतो.. मुलाखत संपताना न राहवून मुलाखतकर्त्या स्त्रियां बोलत्या झाल्या, तुम्हाला भेटण्यापूर्वी तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा इतका सविस्तर आणि खोलवर विचार केला असेल असं खरंच वाटलं नव्हतं.. त्यावर मीही माझ्याही नकळत म्हणालो, मला तरी कुठे वाटलं होतं ? तेव्हां अशा ह्या एकूण पार्श्वभूमीवर आरंभी मी व्यक्त केलेल्या आश्चर्याविषयी कुणाला आश्चर्य वाटायला नको. पण नंतर मग माझ्याचं ध्यानांत आलं की त्यांनी माझी निवड एकाच निकषावर केली आहे. ती म्हणजे आमच्या दोघांच्या पायाखालची मूळ जमीन एक आहे. किंवा दुस-यां शब्दांत सांगायचं तर आम्ही दोघे एकाच सांस्कृतिक घरांत वाढलो आहोत.. त्या घराचं नांव आहे, किर्लोस्करवाडी.. आणि हा घरचा हक्क ध्यानी आल्यावर तो नाकारण्याचा प्रश्नच उभा रहात नाही आणि त्यामुळे आमच्यातला तो ऋणानुबंध उकलतच मी हे माझं मनोगत लिहिणार आहे. मला वाटतं, माझ्या ह्या मनोगताची झाली एव्हढी प्रस्तावना पुरेशी व्हावी.. म्हणजे आता प्रस्तावनाकर्तेपणाचं मनावरचं दडपण दूर करून मी आता माझ्या मनालाच बोलतं करत जातो.
तसे हे वसंत आपटे एरवीही भलतेच चतुर निघाले....मी हा असा अर्जुन-संभ्रम-अवस्थेत असताना त्यांनी माझ्याही ध्यानीमनी नसलेली एक हळूवार नस नेमकी दाबली. ते म्हणाले, काही लिहा हो.. अगदी बालपणच्या तुमच्या संपादकपणाबद्दल लिहिलंत तरी चालेल. मी अंमळ मोहरलोच. (कवी असूनही माझ्या बाबतीत हे असले योग जरा दुर्मिळच) गोष्ट खरी आहे.. बालपणीचं माझं पहिलं स्वप्न संपादक होण्याचंच होतं. त्या वयात वाचन हया बाबतीत मी जरासा सखाराम गटणे होतो. पुढ्यात पुस्तक आलं की त्याचा फडशा पाडायचा. ते आपल्याला कळो न कळो ..मग ते शि.म.परांजपेकृत काळाचे निवडक निबंध असोत की सुधारकमधले गोपाळ गणेश आगरकरलिखित अग्रलेखांचे दहा खंड असोत. ह्या वाचनयज्ञात एकदा द्वा.भ.कर्णिकांचं संपादकाचे जीवनस्वप्न हे नितांत सुंदर पुस्तक आलं आज इतक्या वर्षानंतरही माझ्या मनावरचा त्याचा प्रभाव ओसरलेला नाही. तिथून संपादक ह्या भूमिकेची मोहिनी माझ्यावर जी पडली तीही आजतागायत तितकीच खोल आहे. मग माझे त्यातले बाल-प्रयोग सुरू झाले. हस्तलिखित नियतकालिके काढणे, तत्कालीन मौज, विविधवृत्त, नवयुग (त्यातील दत्तु बांदेकरांचा रविवारचा मोरावळा) ह्याची बालसुलभ नक्कल करीत ती अल्पकाळ चालवणे आणि बंदही पाडणे. त्यामुळे त्यांची नांवंही बुडबुडा, धूमकेतू अशीच होती. बालपणातून किंचित कुमार वयात प्रवेश करताना ते पोरखेळ थांबले. पण तरीही संपादक होण्याचं स्वप्न धुगधुगत होतंच. मग वहीत शाळकरी पोरी जशी त्यांच्या हीरोचं नांव कोरत रहातात, तसा मी कोरीव अक्षरांत लिहीत रहायचो. संपादक : सु.रा.मोघे.. मग कधी स वर अनुस्वार तर कधी प अक्षराला अर्धा म जोडायचा.
वसंत आपटेच्या त्या अनपेक्षित उद्गारांनी ही सगळी आठवण जागी झाली. मजा वाटली. पण मग क्षणांत एक नवल मनांत जागं झालं ..आपण फक्त ती बालपणाची हौस केली. पण त्याच भूमीत वाढलेल्या वसंत आपटेनी मात्र खरोखरच त्या आडवळणी भागात हे आपलं जग उभं केलं सातत्यानं चिकाटीनं, निष्ठेनं चालवलं आणि आज तर त्यांच्या अग्रलेखांचा हा दुसरा (?) संग्रहही पुस्तकरूपात प्रकाशित होतो आहे. आमच्या दोघांच्याही पायाखालची ती प्रेरणादायी भूमी अशी होती तरी काय ? ती महाराष्ट्राच्या नवउद्योगविश्वाची मुहूर्तमेढ होती...पण त्याचबरोबर किर्लोस्कर-स्त्री-मनोहर ह्या सर्वव्यापी नियतकालिकांची ती जन्मभूमीही होती. योगायोग फार मजेदार असतात. त्या मासिकांचा जो पहिला निर्मिती परिवार होता त्यामध्ये एका महत्वाच्या जागी वसंत आपटेचे वडील कार्यरत होते.. त्यांचं नाव, गो. नां. आपटे.
गो.नां. आपटे मला अंधुक अंधुक आठवतात. शुभ्र धोतर-शर्ट आणि अर्धवर्तुळाकार मुठीची लाकडी काठी हातात घेउन फिरायला निघालेले. तशी त्यांनी किर्लोस्करांची नोकरी कधीच सोडली होती आणि त्यामुळे किर्लोस्करवाडीही सोडली होती. परंतू तो परिसर सोडला नव्हता. वाडीच्याच कुंपणाबाहेरील तुपेवाडीत (आजचं रामानंदनगर) ते शेती करीत होते..आणि त्या शेतातच झोपडीवजा टुमदार घर बांधून रहात होते. अल्पावधीत तो आपट्याचा मळा म्हणून ओळखला जाउ लागला. आणि वाडीकरांनां जायला एक ठिकाण तयार झालं. बहुधा काहीतरी मतभेदातूनच त्यांनी वाडी सोडली होती. पण तरीही त्यांचे आणि किर्लोस्कर मंडळीचे संबध अल्पावधीत होते तसे जिव्हाळ्याचे झाले . आणि आपटे कुटुंबीय हे तसे वाडीकरच राहिले ते आजतागायत.
पण माझ्या मनांत गो.ना.आपट्यान्ची प्रतिमा राहिली आहे ती वेगळीच, आमच्या घरातील फोटो आल्बमतील एका ग्रुप फोटोतून. किर्लोस्करवाडीतील नाटकांची परंपरा फार जुनी आणि वेधक आहे. श्रीकांत मोघे आणि सुधीर मोघेही त्याच नाट्यशाळेतून तयार झालेले गडी आहेत. ती परंपरा सुरू झाली त्यातील अगदी आरंभकाळातील महत्वाचं नाटक म्हणजे, तोतयाचे बंड. ते नाटक केवळ इतिहास विषयावरचं होतं म्हणून नव्हे तर गांवाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक वळण होतं. कारण त्यामध्ये नाना फडणीस ह्या मध्यवर्ती भूमिकेत चक्क शं.वां.किर्लोस्क्रर होते.. त्याशिवाय त्यामध्ये आनंदीबाई विजापुरे, गणपतराव विजापुरे, शांताबाई किर्लोस्कर, रा.ग.मोघे, चित्रकार ग.ना.जाधव (चक्क स्त्रीभूमिकेत) अशी मातबर मंडळी होती. आणि त्यामध्ये ज्या भूमिकेचा नाटकाच्या शीर्षकातच समावेश आहे त्या भाउसाहेब पेशव्यांच्या तोतयाच्या भूमिकेत होते, गो.ना.आपटे...तो फोटो पहाताना, प्रत्यक्षात तो न पाहिलेला नाट्यप्रयोग माझ्या मनोभूमीवर घडताना पाहणं हा माझा खूप दिवस एक आवडता चाळा होता. पाहिलंत ? एक साधं मनोगत लिहायच्या निमित्तानं काळाचा केवढा फेरफटका झाला. पण आज हे लिहिण्यामागे किती खोलवर गेलेली मुळं आधारभूत आहेत हेही त्यामुळे कळून येईल.
पण अशी काही प्रदीर्घ पार्श्वभूमी नसती तरी आपलं जग ह्या नियतकालिकाची व्रतस्थ वाटचाल आणि हे सगळे अग्रलेख ह्यांचं मोल कणभरही कमी ठरलं नसतं हेही तितकंच खरं. जीवनाच्या सर्व अंगाना आणि सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे हे लेख खरोखरच वाचनीय आहेत. त्यामध्ये विवेचन आहे..पण खूप सहज आणि स्वाभाविक. आहे.. त्यामागे कसलाही त्रयस्थ किंवा उच्चासनावरचा अभिनिवेश नाही. तुमच्या आमच्या मनातले घोळणारे विचार कुणीतरी मुखर करतं आहे अशी एक अनौपचारिकता ह्या सर्व लेखनाला आहे. आज एकूणच विविध थरावर सर्वत्र तीव्र असमाधान आहे. पण ते व्यक्त करताना जगण्याची चव जावी अशी कडवट निराशावादी भूमिका कणभरही वरचढ होताना ह्या लेखनात दिसत नाही.
परवाच मी माझ्या ब्लॉगवरील स्वगत संवादात आस्तिक आणि नास्तिक ह्या शब्द-संकल्पनांचे मला अभिप्रेत असलेले अर्थ लिहिले आहेत. मी ते पोझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या अर्थाचे मराठी पर्याय म्हणून पहातो. त्या दृष्टीनं ह्या सर्व लेख्नामागे एक सुप्त आस्तिक्यबुद्धी आहे असं मला वाटतं...
आणि म्हणून पुन्हा मूळ पदावर जाण्याचा आरोप गृहीत धरूनही मी हेच म्हणेन की हा वारसा किर्लोस्कर मासिकांचा आहे. औंध संस्थान आणि किर्लोस्करवाडी ह्या जागृत पुण्यभूमीत वास करणा-या अदृश्य मूल्य-तत्वाचा आहे. आणि स्वत: औंधकर महाराज, लक्ष्मणराव किर्लोस्कर, शं.वा.किर्लोस्कर, मुकुंदराव किर्लोस्कर आणि शांताबाई किर्लोस्कर ह्या जागृत साक्षेपी व्यक्तित्वांचाही आहे. पण असा वारसा मिळणं हे जितकं भाग्य ..तितकंच तो वारसा सर्वार्थानं निभावून नेण ही एकप्रकारे कसोटीच असते.. गेलेला काळ आणि त्यांत घडलेले इतिहास हे नेहमीचं नंतर रम्य ठरतात ... पण बदलत्या काळाची परिवर्तनं आणि त्यानी पावलापावलावर पेरलेली आव्हानं हे जितंजागतं वर्तमान हे नेहमीचं अटळ सत्य असतं.. आपल्या मनानं स्वीकारलेल्या आणि जोपासलेल्या चिरंतन मूल्यांची सांगड घालीत त्या सत्याला सामोरं जात आपली वाट चालणं हाच खरा पुरुषार्थ ठरतो.
त्याचं थेट प्रत्यंतर पाहिजे असेल तर आपलं 'जग'ची वाटचाल जाणुन घ्यावी आणि
हे पुस्तकही पहावं ..
तेव्हां , एक सहप्रवासी म्हणून आणि घरचा माणूस म्हणून
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छाही.
सुधीर मोघे ..
मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०११
No comments:
Post a Comment